एक परीक्षा अद्याप शिल्लक
वृत्तसंस्था/ कोलकाता
काँग्रेस नेते राहुल गांधी हे आता कालौघात अत्यंत परिपक्व झाले आहेत. परंतु त्यांची खरी परीक्षा ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारसमोर संसदेत विरोधी पक्षाचे नेतृत्व कसे करतात हीच असणार आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने त्यांना एक राष्ट्रीय नेता म्हणून प्रस्थापित केले आहे. तसा देशाच्या राजकीय चित्रालाही समृद्ध केले आहे. कॅम्ब्रिज विद्यापीठाच्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये विद्यार्थी म्हणून राहुल हे जीवनात काय करावे याबाबत अनिश्चित होते कारण त्यांना त्यावेळी राजकारण आकर्षित करत नव्हते असा दावा 90 वर्षीय अमर्त्य सेन यांनी केला आहे. अर्थशास्त्राचे प्राध्यापक राहिलेले सेन हे नोबेल पुरस्कार विजेते आहेत.
राहुल यांना मी ट्रिनिटी कॉलेजमध्ये ते शिक्षण घेत असल्यापासून ओळखतो. राहुल हे अनेकदा मला भेटण्यासाठी येत होते. त्यावेळी काय करावे याबाबत ते फारसे स्पष्ट विचारांचे नव्हते. त्या वेळी त्यांना राजकारण पसंत नव्हते असे वाटायचे. राहुल गांधी यांना स्वत:च्या राजकीय कारकीर्दीत प्रारंभी समस्यांना सामोरे जावे लागले, परंतु मागील काही वर्षांमध्ये त्यांच्यात बरेच बदल घडून आले आहेत. त्यांची अलिकडची कामगिरी असामान्य स्वरुपात चांगली राहिली असल्याचा दावा सेन यांनी केला.