संरक्षणासंबंधी 546 वस्तूंची आयात नाही होणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
संरक्षणसिद्धतेत आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने भारताने आणखी एक पाऊल टाकले आहे. संरक्षण विभागाने संरक्षण सामग्रीच्या संबंधातील आणखी 546 वस्तूंची आयात थांबविण्याचा निर्णय घेतला असून या वस्तू आता भारतातच निर्माण केल्या जात आहेत. या वस्तूंची सूची घोषित करण्यात आली आहे.
स्वदेश निर्मिती संरक्षण साधनांची ही पाचवी सूची आहे. ‘सकारात्मक स्वदेशीकरण सूची’ या उपक्रमाच्या अंतर्गत नव्या सूचीची माहिती देण्यात आली आहे. संरक्षण विभागाच्या सृजन या पोर्टलवर ही सूची प्रसिद्ध करण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये 12 हजार 300 वस्तूंचे अशा प्रकारे स्वदेशीकरण करण्यात आले आहे. नव्या सूचीत अनेक महत्वपूर्ण साधनांचा समावेश आहे.
अनेक महत्वाची साधने
रिप्लेसमेंट युनिट सिस्टिम, सबसिस्टिम, असेंब्ली, सबअसेंब्ली, साधनांचे सुटे भाग, कांपोनंट आणि अनेक साधनांसाठी लागणारा कच्चा माल यांचा या सूचीत समावेश आहे. ही साधने आतापर्यंत आयात केली जात होती. त्यांचे आयातमूल्य 1,048 कोटी रुपये आहे, अशी माहिती संरक्षण विभागाने सोमवारी दिली.
तीन वर्षांमध्ये मोठी प्रगती
गेल्या तीन वर्षांमध्ये 12 हजार 300 वस्तूंची निर्मिती देशातच केली जात आहे. या वस्तूंची सूचीही वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या वस्तू यापूर्वी आयात केल्या जात होत्या. आता आपल्या तंत्रज्ञांनी त्यांची निर्मिती भारतातच करण्यात यश मिळविले आहे. या सर्व वस्तूंचे मिळून आयात मूल्य 7 हजार 572 कोटी रुपये इतके होते. या वस्तू संरक्षण साधनांशी संबंधित आहेत. आता त्या भारतातच निर्माण केल्या जात असल्याने तंत्रज्ञान विकासाला प्रोत्साहन मिळाले असून परकीय चलनही त्या प्रमाणात वाचले आहे. या वस्तू आता भारतातील विविध उत्पादन केंद्रांमधून संरक्षण विभागाकडून विकत घेतल्या जात आहेत.
‘सृजन’चा प्रारंभ 2020 मध्ये
सृजन या पोर्टलचा प्रारंभ संरक्षण उत्पादन विभागाकडून 2020 मध्ये करण्यात आला आहे. या पोर्टलवरुन स्वदेशनिर्मित वस्तूंची सूची घोषित केली जाते. खासगी उद्योगांनाही या वस्तूंच्या स्वदेशी उत्पादनांसाठी प्रोत्साहित केले जाते. या वस्तू देशातच उत्पादित करण्यासाठी स्टार्ट अप कंपन्या आणि लघु, मध्यम तसेच मोठे उद्योग स्थापन करण्यासाठी केंद्र सरकार साहाय्य करते. गेल्या आठ ते दहा वर्षांमध्ये भारताने अनेक वस्तूंची दर्जेदार निर्मिती स्वदेशातच करण्यास प्रारंभ केला आहे. संरक्षण विभागाकडून अशा वस्तू देशी उत्पादकांकडून खरेदी केल्या जात आहेत. देशातील विविध संशोधन संस्थांचाही या उपक्रमात सहभाग आहे.
विविध कंपन्या सहभागी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने 2014 पासून ‘आत्मनिर्भरता’ कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. विशेषत: संरक्षण क्षेत्रात प्रथम आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आयात केल्या जाणाऱ्या शक्य तितक्या वस्तू भारतातच निर्माण करण्याचा या उपक्रमाचा हेतू आहे. हिंदुस्थान एअरोनॉटिक्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स, भारत डायनामिक्स, बीईएमएल, इंडिया ऑप्टेल, माझगाव डॉक शिपबिल्डिंग, गोवा शिपयार्ड, गार्डनरिच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स आणि हिंदुस्थान शिपयार्ड तसेच अनेक छोट्या कंपन्यांचाही सहभाग या कार्यक्रमात आहे.`