अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून टीमचे तोंड गोड
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी केंद्रीय अर्थसंकल्प 2024 साठी ‘हलवा समारंभा’त भाग घेतला. ही प्रथा अर्थसंकल्प निर्मितीच्या प्रक्रियेच्या अंतिम टप्प्याचे प्रतीक आहे. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प निर्मितीत सामील पूर्ण टीमला हलवा खायला देत तोंड गोड केले आहे. अर्थमंत्र्यांसोबत मंत्रालयाचे अन्य सदस्य म्हणजेच राज्यमंत्री पंकज चौधरी, मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन, अर्थसचिव टी.व्ही. सोमनाथन, डीईए सचिव अजय सेठ देखील हलवा समारंभात उपस्थित होते.
हलवा समारंभ भारतात एक महत्त्वपूर्ण परंपरा असून ती अर्थसंकल्पापूर्वी पार पाडली जाते. अर्थ मंत्रालयाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून अर्थसंकल्प दस्तऐवजाचे काम पूर्ण करण्याचे प्रतीक म्हणजे ही परंपरा आहे. या समारंभात अर्थमंत्री कर्मचाऱ्यांना हलव्याचे वाटप करतात.
मोदी सरकार स्वत:च्या तिसऱ्या कार्यकाळाचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प 23 जुलै रोजी सादर करणार आहे. हा अर्थसंकल्प अनेक ऐतिहासिक निर्णयांनी युक्त असेल असे संकेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिले आहेत. फेब्रुवारीत सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प हा लोकसभा निवडणुकीमुळे केवळ एक लेखानुदान होता. तर आताच्या अर्थसंकल्पात सरकारचे पूर्ण लक्ष रोजगारनिर्मितीवर तसेच व्यापक आर्थिक स्थैर्यावर केंद्रीत राहणार असल्याचे मानले जात आहे.
हा अर्थसंकल्प मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाच्या प्राथमिकता निश्चित करेल, तसेच 2047 पर्यंतचा एक रोडमॅप देखील सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात पायाभूत विकास, निर्मिती, राजकोषीय शिस्त, रोजगार निर्मिती आणि सामाजिक क्षेत्रांवर जोर दिला जाणार असल्याची अपेक्षा आहे.