ग्रामस्थांवर कामाविना बेकार होण्याची वेळ
बेळगाव : मुगळीहाळ (ता. सौंदत्ती) ग्रामपंचायतीकडून रोजगार हमी योजनेतून काम देण्यात येत नाही, त्यामुळे गोरगरिबांवर बेकारीची वेळ आली आहे. त्वरित याची दखल घेऊन काम उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करत मुगळीहाळ ग्रामस्थांतर्फे जि. पं. कार्यालयासमोर अखिल भारत रयत कृषी कामगार संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले. दुष्काळी परिस्थिती असल्याने मागेल त्याला काम देण्याचा आदेश जि. पं. कडून जारी करण्यात आला आहे. असे असले तरी मुगळीहाळ (ता. सौंदत्ती) ग्रा. पं. च्या व्याप्तीमध्ये रोजगार हमी योजनेतून ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येत नसल्यामुळे ग्रामस्थांवर बेकारीची वेळ आली आहे.
दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे सरकारकडून रोहयोअंतर्गत प्रत्येक ग्रा. पं. मध्ये मुबलक प्रमाणात रोजगार उपलब्ध करून दिला आहे. असे असले तरी ग्रा. पं. विकास अधिकारी रोजगार मागितलेल्या नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यास असमर्थता दर्शवत आहेत. रोजगार हमी योजनेंतर्गत आवश्यक असणारा फॉर्म नं. 6 दाखल करूनही पंचायत अधिकारी याची दखल घेत नाहीत. जाब विचारल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. यामुळे ग्रामस्थांवर कामाविना बेकार होण्याची वेळ आली आहे. अनेकवेळा फॉर्म नं. 6 ही दिला जात नाही. अधिकाऱ्यांकडून ग्रामस्थांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. याची त्वरित दखल घेऊन ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांतर्फे देण्यात आला.