सलामीच्या लढतीत भारत-पाकिस्तान आमनेसामने : स्पर्धेचे संपूर्ण सामने मोफत पाहता येणार
वृत्तसंस्था/ कोलंबो, श्रीलंका
महिलांच्या आशिया कप स्पर्धेला उद्यापासून श्रीलंकेत सुरुवात होणार आहे. सलामीच्या सामन्यात भारत व पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान आमनेसामने येणार आहे. 19 जुलै रोजी हा सामना डाम्बुला येथे खेळवण्यात येणार आहे. यंदाच्या आशिया कपमध्ये आठ संघ सहभागी झालेले आहेत. या संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. दि. 19 ते 28 जुलै दरम्यान ही स्पर्धा श्रीलंकेतील विविध शहरात होईल. अंतिम फेरीची लढत 28 जुलै रोजी होईल. विशेष म्हणजे, आशिया कप स्पर्धेतील सर्व सामने हे टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळतील. तसेच हिंदी आणि इतर भाषेत क्रिकेट चाहत्यांना कॉमेंट्रीचा आनंद घेता येणार आहे.
भारतीय संघाने आतापर्यंत 7 वेळा महिला आशिया चषक जिंकला आहे. यंदा टीम इंडिया आठव्यांदा स्पर्धी जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल, यात शंकाच नाही. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा ‘अ‘ गटात समावेश आहे. भारताव्यतिरिक्त या गटात पाकिस्तान, संयुक्त अरब अमिराती (युएई) आणि नेपाळचा समावेश आहे. भारत आणि पाकिस्तान 19 जुलैला आमनेसामने येतील. यानंतर भारत आणि युएई संघ 21 जुलैला समोरासमोर येतील. तर भारत आणि नेपाळ यांच्यात 23 जुलै रोजी सामना होणार आहे. भारतीय संघ आपले सर्व सामने डाम्बुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळणार आहे. ब गटामध्ये यजमान श्रीलंकेसह बांगलादेश, मलेशिया व थायलंड यांचा समावेश आहे. स्पर्धेच्या उपांत्य लढती 26 जुलै रोजी खेळल्या जातील. तर अंतिम सामना 28 जुलै रोजी रंगणार आहे.
हरमनप्रीत, स्मृतीवर मदार
आशिया चषक स्पर्धेसाठी हरमनप्रीतकडे नेतृत्वाची धुरा असणार आहे तर स्मृती मानधना उपकर्णधार असेल. अलीकडेच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20 व वनडे मालिकेत भारतीय संघाने शानदार कामगिरी केली आहे. स्मृती मानधना या मालिकेत प्रभावी ठरली होती. या मालिकेत स्मृतीसह हरमनप्रीत जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, युवा फिरकीपटू श्रेयंका पाटील यांच्या कामगिरीवर नजर असणार आहेत.
आठव्यांदा चषक उंचावण्यासाठी भारतीय महिला सज्ज
महिला आशिया चषकाचे आयोजन सर्वप्रथम 2004 मध्ये करण्यात आले होते. आतापर्यंत ही स्पर्धा 8 वेळा आयोजित करण्यात आली असून, ज्यामध्ये भारतीय संघानं विक्रमी 7 वेळा चषक उंचावण्यात यश मिळवले आहे. तर बांगलादेशचा संघ एकदा विजेता झाला आहे. विशेष म्हणजे पाकिस्तान आणि श्रीलंका या मजबूत मानल्या जाणाऱ्या संघांना देखील ही स्पर्धा जिंकण्यात यश आलेले नाही. यामुळे हरमनप्रीतच्या नेतृत्वात यंदा भारतीय संघ बाजी मारणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
भारतीय महिला संघ – हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष (यष्टीरक्षक), उमा छेत्री (यष्टीरक्षक), पूजा वस्त्राकर, अरुंधती रे•ाr, रेणुका सिंग, डी हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील आणि संजना संजीवन.
आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाचे वेळापत्रक
भारत वि पाकिस्तान (19 जुलै), डाम्बुला
भारत वि युएई (21 जुलै), डाम्बुला
भारत वि नेपाळ (23 जुलै), डाम्बुला.