20 वर्षानंतर भारतीय नेमबाज 10 मी एअर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरीत
वृत्तसंस्था/ पॅरिस
भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने 10 मी एअर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरीत धडक मारली आहे. शनिवारी 10 मी एअर रायफल मिश्र व 10 मी एअर पिस्तूल प्रकारात भारतीय नेमबाजांना अपयश आले. पण मनू भाकरने सायंकाळच्या सत्रात शानदार कामगिरी करत अंतिम फेरी गाठण्यात यश मिळवले. याच प्रकारात सहभाग घेणारी दुसरी स्पर्धक रिदिमा सांगवान 15 व्या स्थानावर राहिली. रविवारी दुपारी मनूचा अंतिम सामना होईल. विशेष म्हणजे, 10 मी एअर पिस्तूल प्रकारात भारतीय नेमबाजाने तब्बल 20 वर्षानंतर अंतिम फेरी गाठली आहे.
मनू भाकर पात्रता फेरीत तिसऱ्या स्थानावर आहे. हंगेरीची वेरोनिका मेजर 582 पहिल्या स्थानावर होती. दक्षिण कोरियाची की जिन ये ही 582 गुणासह दुसऱ्या स्थानावर राहिली. भारताच्या मनू भाकरनं 97, 97, 98, 96, 96 आणि 96 असा स्कोअर केला. तिने 580 गुणासह तिसरे स्थान पटकावले तर भारताची दुसरी नेमबाज रिदिमा सांगवान 15 व्या स्थानी राहिली. आज दुपारी भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता 10 मीटर एअर पिस्टलची अंतिम फेरी होईल. भारताच्या चाहत्यांना मनू भाकरकडून सुवर्णपदकाची आशा असेल. अंतिम फेरीत 8 नेमबाज सहभागी असतील.
20 वर्षानंतर भारतीय नेमबाज अंतिम फेरीत
10 मी एअर पिस्तूल प्रकारात युवा नेमबाज मनू भाकरने तिसरे स्थान मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. मनूच्या या यशामुळे तब्बल 20 वर्षानंतर भारताची महिला नेमबाज अंतिम फेरीत पोहोचली आहे. 2004 मध्ये अथेन्स ऑलिम्पिकमध्ये भारताची नेमबाज सुमा शिरुर 10 मीटर एअर पिस्तूल महिला गटात अंतिम फेरीत पोहोचली होती. त्यानंतर कोणत्याही भारतीय खेळाडूला अंतिम फेरीत स्थान मिळवता आले नव्हते.