अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर यांची टीका
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लोकसभेत पावसाळी अधिवेशनादरम्यान शिरोमणी अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर बादल यांनी शुक्रवारी काँग्रेसवर जोरदार शाब्दिक हल्ला चढविला आहे. काँग्रेस आणि भ्रष्टाचार एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे त्यांनी म्हटले आहे. याचबरोबर भटिंडाच्या खासदाराने आम आदमी पक्ष आणि भाजपलाही लक्ष्य केले होते.
काँग्रेस आणि भ्रष्टाचार एकमेकांपासून कधीच दूर राहू शकत नाहीत. पंजाबमधील गरीबांसाठी प्रकाशसिंह बादल यांनी 2012 मध्ये योजना सुरू केली होती. याच्या अंतर्गत लाखो गरीबांना 4 रुपये दरात एक किलो आटा आणि 20 रुपये दरात एक किलो डाळ दिली जायची. ही योजना अत्यंत चांगली असल्याने केंद्र सरकारने देखील ती लागू केली होती. परंतु पंजाबमध्ये सत्तेवर आल्यावर काँग्रेसने लाखो गरीबांची रेशनकार्डेच रद्द केल्याचा आरोप हरमिसरत कौर बादल यांनी केला आहे.
काँग्रेसपेक्षा आता आम आदमी पक्षाने अधिक संख्येत गरीबांच्या नावावरील रेशनकार्डे रद्द केली आहेत. काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री भारत भूषण आशू यांच्यावर गरीबांसाठीचे धान्य खुल्या बाजारात विकल्याचा आरोप आहे. याप्रकरणी ईडीने त्यांच्या ठिकाणांवर छापे देखील टाकले आहेत. या घोटाळ्यात कुणाचा सहभाग होता आणि यासाठी जबाबदार कोण हे सर्वांसमोर यायला हवे असे हरसिमरत यांनी म्हटले आहे.
रवनीत सिंह बिट्टू लक्ष्य
रवनीत सिंह बिट्टू आता दुसऱ्या पक्षात आहेत, परंतु याप्रकरणी त्यांचे नाव देखील घेतले जात आहे. आशू आणि बिट्टू यांचे सख्य सर्वांनाच माहित आहे. आशू यांना अटक झाल्यावर बिट्टू यांनीच त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला होता. गरीबांच्या हक्काचे धान्य हडपणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात कारवाई व्हायला हवी असे अकाली दलाच्या खासदाराने म्हटले आहे.
भाजपवरही टीका
भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करत आहे, यात कुठलाच संशय नाही. तपास यंत्रणांकडून केवळ विरोधकांवरच कारवाई केली जात आहे. तर भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांना क्लीनचिट मिळत असल्याचा दावा हरसिमरत कौर यांनी केला आहे.