वृत्तसंस्था / नवी दिल्ली
निवडणूक रोखे प्रकरणाची चौकशी विशेष अन्वेषण दलाकडून करण्याचा आदेश देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. या प्रकरणाची अशी चौकशी करण्याची कोणतीही आवश्यकता नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयानेच यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात निवडणूक रोखे योजना घटनाबाह्या ठरवून रद्द करण्याचा आदेश दिला होता.
या योजनेत ज्यांनी देणग्या दिल्या आहेत आणि ज्या राजकीय पक्षांना त्या मिळाल्या आहेत, त्यांची सर्व माहिती उघड करा असा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँक आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला दिला होता. त्यानुसार ही सर्व माहिती उघड करण्यात आली होती. नंतर एका संस्थेने या प्रकरणाची विशेष दलाच्या माध्यमातून (एसआयटी) चौकशी करावी अशी मागणी करणारी याचिका सादर केली होती. ही याचिकाही फेटाळण्यात आली आहे.