वायनाडमधील मृतांचा आकडा तीनशेपार : चार दिवसांनंतर चौघांचा सुरक्षित बचाव
वृत्तसंस्था/ वायनाड
केरळमध्ये भूस्खलनाची घटना घडल्यापासून चौथ्या दिवशी लष्कराने 4 जणांना जिवंत बाहेर काढले. यामध्ये दोन पुऊष आणि एक महिला आहे. हे चौघेही एकाच कुटुंबातील आहेत. ते पडवेट्टी कुन्नूमध्ये अडकले होते. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 313 वर पोहोचला आहे. 130 लोक ऊग्णालयात आहेत, तर अपघाताला चार दिवस उलटूनही 206 लोक अद्याप बेपत्ता आहेत. लष्कर आता मोबाईलच्या शेवटच्या लोकेशननुसार लोकांना शोधण्याचे काम करत आहे.
वायनाड जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सध्या मदत व पुनर्वसन मोहीम सुरू आहे. मुंडक्काई आणि चुरलमाला या भूस्खलनाने सर्वाधिक प्रभावित झालेल्या भागांची 6 झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. येथे श्वान पथकासह बचाव पथक बेपत्ता लोक आणि मृतदेह शोधण्यासाठी शोधमोहीम राबवत आहे. त्यात सशस्त्र दल आणि पोलिसांच्या 40 तुकड्यांचा समावेश आहे.
आतापर्यंत 9328 लोकांना 91 मदत छावण्यांमध्ये सुरक्षितपणे हलवण्यात आले आहे. यापैकी 578 कुटुंबातील 2328 लोक चुरमाला आणि मेप्पडी येथील आहेत. सर्वाधिक विनाश याच भागात झाल्याचे केरळचे महसूल मंत्री के. राजन यांनी सांगितले. तर, मुंडक्काई, चुरलमाला, अट्टामाला आणि नूलपुझा गावात बचाव कार्य पूर्ण झाले आहे. आता केवळ मृतदेहांचा शोध सुरू असल्याचे लष्कराचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल व्ही. टी. मॅथ्यू यांनी सांगितले.
आपद्ग्रस्तांना काँग्रेसकडून 100 हून अधिक घरे
वायनाडचे माजी खासदार राहुल गांधी यांनी नुकताच घटनास्थळाचा दौरा केला. या दौऱ्यानंतर त्यांनी ही मोठी राष्ट्रीय आपत्ती असल्याचे म्हटले आहे. तसेच आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी काँग्रेस पक्षाकडून 100 हून अधिक घरे बांधणार असल्याचे सांगितले. दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनीही भूस्खलन दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला. या कठीण काळात आम्ही भारतासोबत आहोत. बचावकार्यात सहभागी झालेल्या लोकांचे आम्ही कौतुक करतो, असे बिडेन म्हणाले.