वाहनचालकांना नाहक त्रास : त्वरित दुरुस्तीची मागणी
धामणे : मच्छे ते वाघवडे हा 5 कि. मी.चा रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे येथील वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा. अथवा नवीन डांबरीकरण करावा, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून मच्छे ते वाघवडे रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. मागील 10 ते 15 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविणे कसरतीचे बनत आहे. परिणामी अंधारात तर अनेक अपघात घडत आहेत. काही ठिकाणी तर खड्ड्यांतून मार्ग काढणे म्हणजे अपघातांच्या जीवाला धोकाच निर्माण होत आहेत. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी वाघवडे ग्रामस्थांनी केली आहे.
हा रस्ता अत्यंत खराब झाला असून रुग्णांना जिल्हा रुग्णालय अथवा खासगी इस्पितळांमध्ये नेताना जीव धोक्यात घालावा लागत आहे, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या. मच्छे गावापासून साधारण 5 कि.मी. रस्त्यावर प्रवास करण्यासाठी तब्बल अर्ध्यातासाहून अधिक कालावधी लागत आहे. तर मच्छेपासून काही अंतरापर्यंत दुतर्फा कारखाने सुरू करण्यात आले असून वाहनधारकांना खराब रस्त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मच्छे ते वाघवडे या खराब झालेल्या रस्त्याला कोण वाली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे नागरिकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. तेंव्हा लोकप्रतिनिधींनीही याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून व कारखानदारांकडून केली जात आहे.