वृत्तसंस्था / नवी दिल्ली
इस्रायलला जाऊ इच्छिणाऱ्या भारतीयांना केंद्र सरकारने सावधगिरीचा इशारा दिला आहे. सध्या मध्यपूर्वेतील वातावरण तणावग्रस्त आहे. संघर्षाचा भडका उडू शकेल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ज्यांना इस्रायलला भेट द्यावयाची आहे, त्यांनी अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तसेच अनावश्यक असल्यास त्या देशाचा दौरा टाळा, अशी मार्गदर्शनपर सूचना प्रवाशांना करण्यात आली आहे.
7 ऑक्टोबर 2023 पासून इस्रायलचे गाझा पट्टीत हमास या दहशतवादी संघटनेशी युद्ध होत आहे. तेव्हापासून मध्यपूर्वेतील वातावरण तणावग्रस्त आहे. नुकतीच हमासचा राजकीय प्रमुख इस्लाईल हानिया याची इराणमध्ये हत्या करण्यात आली आहे. ही हत्या इस्रायलची गुप्तचर संस्था मोस्सादने केली असा आरोप इराणने केला आहे. तसेच या हत्येचा सूड उगविला जाईल, अशी धमकी दिली आहे. इस्रायलनेही आपण कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज आहोत, असे प्रतिपादन केले आहे. त्यामुळे सध्या स्थिती नाजूक असून इराणने खरोखरच इस्रायलवर हल्ला केला तर मोठ्या युद्धाला तोंड फुटू शकते. त्यामुळे अनेक देशांनी आपल्या प्रवाशांना इस्रायल टाळण्याची सूचना केली आहे. भारतानेही शुक्रवारी परिस्थितीवर विचार करु शनिवारी इस्रायलला जाऊ इच्छिणाऱ्या भारतीय प्रवाशांना भारताच्या परराष्ट्र विभागाने सावधाननेचा इशारा दिला आहे.