विरोधी पक्षांवर साधला निशाणा
वृत्तसंस्था/ चंदीगड
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी चंदीगडमध्ये स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत राबविण्यात आलेल्या 24 तास जलपुरवठा प्रकल्पाचे लोकार्पण केले. यादरम्यान त्यांनी विरोधी पक्षांवर जोरदार निशाणा साधला आहे. विरोधी पक्षांना जे म्हणायचे ते म्हणू द्या, 2029 मध्ये पुन्हा रालोआचे सरकारच येणार आहे. विरोधी पक्षांचे नेते 5 वर्षे सरकार चालणार नाही असे म्हणत आहेत, परंतु मी त्यांना मोदी सरकार पूर्ण 5 वर्षे चालणार असल्याचे ठणकावून सांगू इच्छितो असे शाह यांनी म्हटले आहे.
10 वर्षांमध्ये मोदी सरकारने सर्जिकल स्ट्राइक आणि एअरस्टाइक घडवून आणले. काश्मीरमधून कलम 370 हद्दपार करण्याचा निर्णय घेतला. देशाच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास दाखविला आहे. या पुढे देखील लोक कामावर विश्वास ठेवतील असे शाह यांनी म्हटले आहे.
तर गृहमंत्री अमित शाह यांच्या चंदीगड दौऱ्यावरून पोलिसांनी काँग्रेस नेते आशीष गजनवी यांना ताब्यात घेतले होते. गजनवी आणि त्यांचे सहकारी गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात वारंवार निदर्शने करत असतात. याचमुळे पोलिसांनी खबरदारीदाखल त्यांना ताब्यात घेत स्थानबद्ध केले होते.