मुस्लिमांचा अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध दर्शवत सरकार मुस्लिमांचे अधिकार हिरावून घेऊ पाहत असल्याचा आरोप सोमवारी केला आहे. केंद्र सरकारने वक्फ बोर्डाला नियंत्रित करणाऱ्या 1995 च्या कायद्यात दुरुस्तीसाठी संसदेत विधेयक मांडण्याची तयारी केली असताना अखिलेश यांनी ही टिप्पणी केली आहे. समाजवादी पक्षाच्या अन्य नेत्यांनीही वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाला विरोध दर्शविला आहे.
ही दुरुस्ती वक्फच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी केला जात अल्याचे सरकारचे सांगणे आहे. तर या दुरुस्ती विधेयकामुळे संबंधित संस्थांमध्ये महिलांची भागीदारीही सुनिश्चित होऊ शकेल. या दुरुस्ती अंतर्गत वक्फ बोर्डाला त्याच्या मालमत्ता जिल्हाधिकाऱ्यांकडून नोंदणीकृत करवून घ्याव्या लागतील, जेणेकरून त्याचे खरे मूल्य निश्चित करता येईल.
विधेयकाला समाजवादी पक्षाचा विरोध
आम्ही या दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात आहोत. भाजपचे काम केवळ हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडणे आहे. भाजप केवळ मुस्लिम बंधूंचे अधिकार हिरावून घेऊ पाहत आहे. याचमुळे भाजपन मुस्लिमांना घटनेने दिलेले अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे. यापूर्वी मोदी सरकारने अँग्लो-इंडियन्सचे अधिकार काढून घेतले, अँग्लो-इंडियन्ससाठी यापूर्वी लोकसभा आणि विधानसभेत प्रत्येकी एक जागा राखीव होती. मोदी सरकारने बनावट जनगणनेच्या मदतीने अँग्लो-इंडियनसाठी राखीव या जागाही हिरावून घेतल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे.
नजूल विधेयकावर कठोर भूमिका
सप अध्यक्ष अखिलेश यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही नजूल मालमत्ता विधेयकावरून लक्ष्य केले. आमच्या मुख्यमंत्र्यांना नजूल हा शब्द उर्दू असल्याचे वाटले, अधिकाऱ्यांनी त्यांना नजूलविषयी समजविले तरीही योगींना नजूलचा अर्थ मुस्लिमांच्या जमिनी असल्याची भूमिका घेतली. नजूल या उर्दू शब्दामुळे योगी पूर्ण प्रयागराज आणि गोरखपूर रिकामी करवू पाहत आहेत. गोरखपूरमध्ये त्यांचा आणि त्यांच्या काही साथीदारांचा वैयक्तिक स्वार्थ देखील असल्याचा दावा अखिलेश यादव यांनी केला. नजूल विधेयक राज्य सरकारने विधान परिषदेत मांडले होते, परंतु तेथे भाजपच्या काही सदस्यांनी विरोध केल्याने हे विधेयक संमत होऊ शकले नव्हते.
मौर्य हे स्टूल किट मंत्री
जातनिहाय सर्वेक्षणावरून अखिलेश यादव यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्यावर उपरोधिक टिप्पणी केली आहे. राज्यात एक स्टूल किट नेता आहेत, ते नेहमीच किट-किट करत असतात. स्टूल किटयुक्त मंत्र्याला वरून आदेश मिळाल्यावरच तो अशाप्रकारचे प्रस्ताव मांडत असतो असे अखिलेश यादव यांनी केशव प्रसाद मौर्य यांना उद्देशून केली आहे. एका कार्यक्रमात खुर्ची उपलब्ध नसल्याने मौर्य याना स्टूलवर बसावे लागले होते. याच गोष्टीचा उल्लेख करत अखिलेश यांनी त्यांना लक्ष्य केले आहे.