वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेस नेत्या प्रियांका वड्रा यांनी मोदी सरकारवर प्रसारण सेवा (विनियमन) विधेयकाच्या मुद्द्यावरून टीका केली आहे. सरकार डिजिटल मीडिया, सोशल मीडिया, ओटीटी प्लॅटफॉर्म, वैयक्तिक स्तरावर लिहिणाऱ्या आणि व्यक्त होणाऱ्या लोकांवर अंकुश आणण्याची तयारी करत असल्याचा आरोप प्रियांका वड्रा यांनी केला आहे. सरकारचे हे कृत्य सहन केले जाणार नाही. महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरु यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि प्रसारमाध्यम स्वातंत्र्यावर जोर दिला होता असे वड्रा यांनी म्हटले आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि संघटनेच्या अधिकाराचे रक्षण आम्ही करणार आहोत. आमच्या नागरिकांना मिळालेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि माध्यम स्वातंत्र्य सहज मिळालेले नाही. याकरता कित्येक वर्षांपर्यंत लाखो लोकांनी लढा दिला आहे. नागरिक स्वातंत्र्य आणि माध्यम स्वातंत्र्य आमच्या हुतात्मा आणि स्वातंत्र्यसेनानींचा महान वारसा आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात कुठलेच सराकर नागरिकांना मिळालेल्या स्वातंत्र्याला चिरडण्याविषयी विचारही करू शकत नाही. आज एकीकडे प्रसारमाध्यमांना सरकारचा प्रशंसक करण्यात आले आहे. दुरसीकडे भाजप सरकार ब्रॉडकास्ट विधेयक आणून डिजिटल मीडिया, सोशल मीडिया, ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. हा प्रकार पूर्णपणे अस्वीकारार्ह आहे. देश अशाप्रकारच्या कृत्यांना सहन करणार नसल्याचा दावा वड्रा यांनी केला.