अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा : शेती सुधारणा युवक मंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : 32 कि.मी. लांबीच्या नाला परिसरातील शेतीपिकांचे नुकसान
बेळगाव : बळ्ळारी नाल्यातील गाळ काढण्यात आला नसल्याने नाल्याच्या परिसरातील 600 एकरपेक्षा अधिक सुपीक जमिनीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. नाल्याला प्रत्येकवर्षी येणाऱ्या पुरामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. प्रशासनाने याची त्वरित दखल घेऊन नाल्यातील पाण्याचा योग्यप्रकारे निचरा करण्याची सोय करून देण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा शेती सुधारणा युवक मंडळातर्फे देऊन निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांना निवेदन दिले. बळळरी नाल्यामुळे परिसरातील शेकडो एकर जमिनीतील पिकांचे नुकसान होत आहे. यासाठी शेतकऱ्यांकडून अनेकवेळा आंदोलन करून जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. मात्र याची दखल घेण्यात आलेली नाही.
32 किलोमीटर लांबीच्या नाल्याच्या परिसरातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. खरिप हंगामासह रब्बी हंगामातील पिके घेणे कठीण झाले आहे. नाल्यामध्ये शहरासह परिसरातील सांडपाणी सोडले जात असल्याने नाला नेहमीच तुडुंब भरून वाहत आहे. पावसाळ्यामध्ये परिसरातील शेकडो एकर जमिनीतील पिके पाण्याखाली जात आहेत. शहर व उपनगरातील कूपनलिका व विहिरींचे पाणीही दूषित होत आहे. याची दखल घेण्यात यावी, यासाठी नाल्याचे रुंदीकरण करून सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी रमाकांत कोंडुसकर, अमोल देसाई, कीर्तीकुमार कुलकर्णी, मनोहर हलगेकर, रणजित चव्हाण-पाटील, मधुकर बिर्जे, राजू मरवे, लक्ष्मण शिंदे, महेश जुवेकर, भाऊराव पाटील आदी उपस्थित होते.
प्रशासनाच्या अडमुठ्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांवर अन्याय
अनेकवेळा प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. मात्र याची कोणाकडूनही दखल घेतली जात नाही. महानगरपालिका आपल्या हद्दीत येत नाही, तर पाटबंधारे खाते आपल्या हद्दीत येत नसल्याचे सांगत आहे. त्यामुळे नेमका हा नाला कोणाच्या हद्दीत येतो? असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित करण्यात आला. प्रशासनाच्या अडमुठ्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असून जिल्हाधिकाऱ्यांनी याची तातडीने पाहणी करावी व तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली.