पालकमंत्री जारकीहोळी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश
बेळगाव : अतिवृष्टी व पूरग्रस्त गोकाकला सोमवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भेट दिली. गोकाक शहर व तालुक्यातील विविध ठिकाणी पाहणी करून काळजी केंद्रात आश्रय घेतलेल्या नागरिकांशीही त्यांनी संवाद साधला. घटप्रभेच्या पुरामुळे पाण्याखाली गेलेल्या लोळसूर पुलाचीही मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. गोकाक व चिकोडी तालुक्यांच्या दौऱ्यासाठी विशेष विमानाने सोमवारी सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे सांबरा विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांनी गोकाक येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केली.
यावेळी अरभावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी लोळसूर पुलासंबंधी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली. पावसाळ्यात दरवर्षी पुलावर पाणी येते. त्यामुळे नागरिकांच्या अनुकूलासाठी नवा पूल उभारण्याची त्यांनी मागणी केली. यावेळी चिकोडीच्या खासदार प्रियंका जारकीहोळी, विधान परिषद सदस्य लखन जारकीहोळी आदी उपस्थित होते. लोळसूर पुलाजवळ असलेले गोकाक येथील जुना जनावरांचा बाजार, मटण मार्केट, कुंभार गल्ली, उप्पार गल्ली, बोजगार गल्लीया गेल्या एक आठवड्यापासून पाणी शिरलेल्या परिसराला भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी तेथील परिस्थितीची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी मुख्यमंत्र्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली.
संकेश्वर-यरगट्टी राज्य मार्गासाठी लोळसूर पूल महत्त्वाचा आहे. दरवर्षी पावसाळ्यात पुलावर पाणी येते. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना त्रास होतो आहे. पुलाची उंची वाढवून नवा पूल उभारण्याची मागणी पालकमंत्र्यांनीही केली. त्यानंतर गोकाक येथील म्युनिसिपल कॉलेजमध्ये सुरू करण्यात आलेल्या काळजी केंद्राला भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी नागरिकांशी चर्चा केली. काळजी केंद्रात जेवणखाण, पिण्याचे पाणी, औषधांचा तुटवडा भासू नये, अशी अधिकाऱ्यांना सूचना केली. यावेळी राज्याच्या मुख्य सचिव शालिनी रजनीश, बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक विकाशकुमार विकाश, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, जि. पं. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे आदी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.