मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची ग्वाही : मांजरी येथील कृष्णा नदीकाठ भागाची पाहणी
वार्ताहर/मांजरी
प्रशासनाकडून नद्यांची पूरस्थिती लक्षात घेऊन योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती. तसेच जलसंपदा विभागाकडून समन्वय साधला जात होता. त्यामुळे पूरस्थिती योग्यरित्या हाताळता आली. सध्या कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी झाल्यामुळे पाणीपातळी कमी हेत आहे. पूर परिस्थिती कमी झाल्यानंतरच नुकसान भरपाईचा सर्व्हे करून नुकसान पोहोचलेल्या पूरग्रस्तांना योग्य ती मदत देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली. कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रासह कोकण भागात सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे चिकोडी उपविभागातून वाहणाऱ्या दूधगंगा, वेदगंगा, कृष्णा, पंचगंगा नद्यांना पूर आल्याने सुमारे 60 हजार हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेले आहे. महापुराचे पाणी अगदी संथ गतीने कमी होत आहे.
या परिस्थितीची पाहणी करण्याकरिता राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मांजरी येथील पुलावरून पूरस्थितीची पाहणी केली. कृष्णा नदी काठावरील अंकली, मांजरी, येडूर, चंदूर, इंगळी या गावांना महापुराने विळखा घातला आहे. नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात नागरी वस्तीमध्ये शिरले नसले तरी शेतीमध्ये शिरल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. पुराचे पाणी अतिशय संथ गतीने कमी होत आहे. पूरस्थिती लवकरच ओसरेल व त्यानंतर नुकसानीची पाहणी करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, बेळगाव जिल्हा पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार राजू कागे, खासदार प्रियांका जारकीहोळी उपस्थित होते.