नव्या विधेयकाचे सूफी कौन्सिलकडून स्वागत : विरोधकांना सल्ला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारकडून वक्फ बोर्ड कायद्यात दुरुस्तीसाठी विधेयक आणले जाणार आहे. या विधेयकासंबंधी शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली होती. या विधेयकाला असदुद्दीन ओवैसी यांच्यासमवेत अनेक मुस्लीम नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. तर याचदरम्यान अजमेरची मुस्लीम संघटना ऑल इंडिया सूफी सज्जादानशीं कौन्सिलने या विधेयकाचे स्वागत गेले आहे. या विधेयकामुळे वक्फ बोर्डातील भ्रष्टाचार संपणार आहे. याचमुळे आम्ही या दुरुस्तीचे स्वागत करतो, परंतु यामुळे कुणाच्याही हितसंबंधांना धक्का पोहाचणार नाही याची खबरदारी घेतली जावी असे कौन्सिलचे अध्यक्ष सैयद नसीरुद्दीन चिश्ती यांनी म्हटले आहे.
वक्फ कायद्यात दुरुस्ती केली जावी अशी मागणी आम्ही वारंवार भारत सरकारकडे करत राहिलो आहोत. अनेकदा सरकारला आम्ही यासंबंधी निवेदनही सोपविले आहे. सरकार आता दुरुस्ती विधेयक आणण्याच्या तयारीत आहेत. दर्गांची स्थिती निश्चित करत त्यांना संरक्षण मिळणे आवश्यक आहे. आम्ही सर्व राजकीय पक्षांना याप्रकरणी राजकारण न करण्याचे आवाहन करतो. मुस्लिमांच्या हितांची काळजी घेतली जावी. विरोधी पक्षांनी चर्चेत भाग घेत विधेयक संमत करविण्यास सरकारला मदत करावी असे चिश्ती यांनी म्हटले.
वक्फ बोर्डात पारदर्शक असायला हवी आणि त्यात भ्रष्टाचाराला कुठलेच स्थान नसावे. परंतु सध्या प्रत्येक राज्यात वक्फ बोर्डांमध्ये भ्रष्टाचार आहे. आम्ही याचमुळे सरकारच्या वक्फ दुरुस्ती विधेयकाचे स्वागत करतो. आम्ही या मुद्द्यावर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना पत्र लिहित त्यांची भेट घेतली होती. हे विधेयक अल्पसंख्याक आणि मुस्लिमांच्या हिताचे असेल अशी अपेक्षा आहे. याप्रकरणी मुस्लीम समुदायाची दिशाभूल कुणी करू नये असे चिश्ती यांनी म्हटले आहे.