जिल्हा पंचायतीसमोर रामदुर्ग तालुक्यातील आंदोलकांचा पवित्रा
बेळगाव : ग्रामीण भागातील जनतेला रोजगार मिळावा याबरोबरच विकासकामांना चालना मिळावी या उद्देशाने सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेमध्ये ग्रा. पं. सदस्यांसह अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचार करण्यात आला असल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावे, हडपण्यात आलेली रक्कम वसूल करण्यात यावी, या मागणीसाठी जिल्हा पंचायतीसमोर गेल्या सहा दिवसांपासून आंदोलन करणाऱ्यांशी अधिकाऱ्यांनी संवाद साधला. मात्र कारवाईशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा पावित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे. रामदुर्ग मुदेनूर व ओबळापूर या ग्रा. पं. मध्ये झालेल्या रोजगार हमीतील भ्रष्टाचाराची जि. पं. कडून गंभीर दखल घेऊन वसुलीसाठी अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. तर काही जणांनी रक्कम भरली आहे.
तर भ्रष्टाचाराची रक्कम न भरलेल्या ग्रा. पं. सदस्यांच्या मालत्तांवर बोजा चढविण्यात आला आहे. आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवासगौड पाटील यांच्याशी जि. पं. अधिकाऱ्यांनी संवाद साधून आंदोलन मागे घेण्यासाठी आवाहन केले. दरम्यान झालेल्या भ्रष्टाचाराची उलट तपासणी केली. त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांचीही पाहणी करण्यात आली. मात्र श्रीनिवासगौड यांनी रोखठोक भूमिका घेत भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या रामदुर्ग तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे. गेल्या तीन वर्षांपासून तक्रार करूनही दखल का घेण्यात आली आहे, असा सवालही त्यांनी अधिकाऱ्यांना केला. दरम्यान अधिकाऱ्यांनी संबंधितांना नोटीस बजावण्यात आली असून रक्कमही वसूल करण्यात आली आहे. तर ग्रा. पं. सदस्यांच्या मालमतांवर बोजा चढविण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. मात्र ता. पं. अधिकाऱ्यांच्या निलंबनाशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका घेत आंदोलन सहाव्या दिवशीही सुरू ठेवण्यात आले आहे.
ग्रा. पं. अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींना धडकी
जिल्हा पंचायतीकडून रामदुर्ग तालुक्यातील ओबळापूर व मुदेनूर ग्रा. पं. च्या संबंधित अधिकाऱ्यांसह ग्रा. पं.अध्यक्षांच्या मालमत्तांवर टाच आणण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यामध्ये ग्रा. पं. च्या व्याप्तीत रोहयोत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. भ्रष्टाचार संदर्भातील प्रकरणांची तक्रार ओंबड्समनकडे दाखल करण्याचे आवाहन जि. पं. कडून करण्यात आले आहे. त्यामुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांसह ग्रा. पं. लोकप्रतिनिधींच्या मनात धडकी भरली आहे.