मंगळवारी पावसाने दिली उघडीप : मात्र शेतशिवारात पाणी अद्याप साचूनच
वार्ताहर/किणये
तालुक्यात मंगळवारी पावसाने थोड्या प्रमाणात विश्रांती घेतली होती. त्यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे. पावसाने थोडी उघडीप दिली असली तरीही शिवारात पाणी अद्याप साचूनच आहे. तसेच नाले व नदीकाठावरील जमीन पाण्याखाली गेलेली आहे. पावसाचा जोर कमी झाला असल्यामुळे नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत घट होऊ लागली आहे. यंदा मुसळधार पाऊस झाला. गेले पंधरा दिवस पावसाची संततधार सुरूच होती. यामुळे नदी-नाल्यांना पूर आला होता. तसेच बऱ्याच गावातील मुख्य व संपर्क रस्त्यांवर पाणी आले होते. काही ठिकाणी पूल वाहून गेलेले आहेत. यामुळे या पावसाला नागरिक अक्षरश: कंटाळून गेले होते. अखेर मंगळवारी पावसाने थोड्या प्रमाणात विश्रांती घेतली असल्यामुळे शेतकऱ्यांसह सर्व नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांनी या मुसळधार पावसापूर्वीच भातरोप लागवड केली होती. मात्र याच शिवारात पाणी साचून बहुतांशी प्रमाणात भातरोप शेती पाण्याखाली गेलेली आहे. तसेच मार्कंडेय नदीच्या काठावरील सोनोली, बेळगुंदी, यळेबैल गावातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी पाण्याखाली गेल्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. बेळवट्टी, बिजगर्णी, कावळेवाडी, किणये, बहाद्दरवाडी, कर्ले, संतीबस्तवाड, वाघवडे भागात शेतकऱ्यांनी आपल्या शिवारात रताळी वेल लागवड केलेली आहे. मात्र या रताळी वेल पिकामध्ये सध्या पावसाचे पाणी साचलेले आहे. त्यामुळे ते बऱ्याच ठिकाणी खराब झाले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मच्छे व पिरनवाडी भागातील अनेक नागरिकांच्या घरात गेले पंधरा दिवस पाणी येत होते. त्यामुळे या लोकांचे जगणे अक्षरश: मुश्किल बनले होते. मंगळवारी पावसाने उघडीप दिल्यामुळे त्यांच्या घरात येणारे पाणी थोड्या प्रमाणात कमी झाले असल्याची माहिती काही स्थानिकांनी दिली.