पावसात घरे पडून नुकसान झालेल्या कुटुंबीयांना तातडीने भरपाई देण्याचे अधिकाऱ्यांना आवाहन
खानापूर : तालुक्यात झालेल्या संततधार पावसामुळे 201 घरांची पडझड झाली असून यात 39 घरे पूर्णपणे पडलेली आहेत. या घरांना काँग्रेस सरकारच्यावतीने पूर्ण घर पडलेल्या घराला 1 लाख 20 हजार तसेच मागासवर्गीयांना 1 लाख 50 हजार नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. शिवाय त्यांना नवीन घर बांधून देण्यात येणार आहे. याचा लाभ थेट नुकसानभरपाई ग्रामस्थाला मिळणार आहे. यासाठी नुकसानग्रस्तांनी आपली माहिती पंचायत कार्यालयात अथवा तहसीलदार कार्यालयात देण्यात यावी, असे आवाहन माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी तालुक्यातील पडझड झालेल्या घरांची पाहणी करताना बिडी येथे पत्रकारांशी बोलताना केले आहे. यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार प्रकाश गायकवाड, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष महादेव कोळी, अॅड. ईश्वर घाडी, सुरेश जाधव, संदीप देसाई, महिला ब्लॉक काँग्रेसच्या अध्यक्षा गीता अंबडकट्टी यासह इतर काँग्रेसचे कार्यकर्ते, ग्रा. पं. अधिकारी, उपतहसीलदार उपस्थित होते.
तालुक्यात संततधार होत असलेल्या पावसामुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी मंगळवारी केली. प्रथम खानापूर येथील मारुती सुंठकर, बाळू घाडी, इस्पा जोजे लोबो, जोतिबा देवलत्तकर यांच्या पडझड झालेल्या घरांची पाहणी करून विचारपूस केली. आणि शासनाच्या नव्या धोरणानुसार नुकसानग्रस्त मालकांना 1 लाख 20 हजार तातडीची मदत तसेच शासनाच्या योजनेतून नवे घर बांधून देण्याची घोषणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बेळगाव दौऱ्यात केली आहे. त्यानुसार नुकसानग्रस्त घरमालकांना ही सवलत मिळणार आहे. यासाठी नुकसानग्रस्तांनी आपली माहिती व आणि पंचायतीकडे द्यावी, असे सांगितले. यानंतर बिडी, होसेट्टी, गोलिहळळी येथील पडझड झालेल्या घरांची पाहणी केली. यावेळी अंजली निंबाळकर यांनी अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्यात यावी, अशा सूचना केल्या.