19 ऑगस्टला होणार यात्रेची सांगता
वृत्तसंस्था/ श्रीनगर
अमरनाथ यात्रेचा गेल्यावषीचा विक्रम अवघ्या 39 दिवसात भाविकांनी मोडला आहे. 6 ऑगस्ट रोजी 2,813 भाविकांचा जत्था रवाना झाल्यानंतर भाविकांनी यंदाच्या हंगामात यात्रेकरून 5 लाखांचा टप्पा ओलांडला. आतापर्यंत पाच लाखहून अधिक भाविक बाबा बर्फानींच्या दर्शनासाठी आले आहेत. गेल्यावषी एकूण साडेचार लाख भाविक आले होते. तर, 2011 मध्ये सर्वाधिक 6.35 लाख भाविकांची नोंद झालेली आहे.
12 वर्षांनंतर अमरनाथ यात्रेला येणाऱ्या भाविकांची संख्या पाच लाखांच्या पुढे गेली आहे. आजपर्यंतच्या यात्रेच्या इतिहासात तिसऱ्यांदा एवढ्या मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी आले होते. यापूर्वी 2011 मध्ये 6.35 लाख आणि 2012 मध्ये 6.20 लाख शिवभक्तांनी बाबा बर्फानीच्या दरबारात हजेरी लावली. मंगळवारी 2,813 भाविक पवित्र गुहेत पोहोचल्यानंतर आत्तापर्यंत आलेल्या भाविकांची संख्या 5,00,105 वर पोहोचली आहे. अजूनही हा आकडा वाढतच राहणार आहे. यंदा 29 जूनपासून सुरू झालेली 52 दिवसांची अमरनाथ यात्रा 19 ऑगस्टला रक्षाबंधनाच्या दिवशी संपेल.
काश्मीरमधून कलम 370 हटवून पाच वर्षे पूर्ण झाल्यामुळे बाबा अमरनाथ यात्रा समूहाला सुरक्षेच्या कारणास्तव गेल्या सोमवारी हिरवा झेंडा दाखवण्यात आला नाही. मंगळवारी पुन्हा प्रवास सुरू करण्यात आला. यात्रा आता अंतिम टप्प्यात पोहोचल्याने भाविकांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. बाबा अमरनाथ यात्रेसाठी छडी मुबारक 14 ऑगस्ट रोजी श्रीनगरच्या दशनामी आखाड्यातून पवित्र गुहेकडे रवाना होणार आहे. छडी मुबारक 19 ऑगस्ट रोजी पारंपरिक पहलगाम मार्गाने पवित्र गुहेत पोहोचेल. श्रीनगर येथील श्री अमरेश्वर मंदिर आखाडा येथे बुधवारी छडी मुबारक प्रतिष्ठापना सोहळा झाली असून नागपंचमीला 9 ऑगस्ट रोजी पारंपरिक छडी पूजन होणार आहे.