आठ मधपोळ्यांचे जतन : शेतकऱ्यांना आदर्श
बेळगाव : जांबोटी येथील एका शेतकऱ्याची मधमाशी संवर्धनासाठी धडपड सुरू आहे. परसातच आठ मधपोळ्यांचे जतन त्यांनी केले आहे. दहा वर्षांपासून त्यांचा हा उपक्रम सुरू आहे. मधमाशी पालनामुळे शेतातील इतर पिकांनाही त्याचा फायदा होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या बागायती शेतीमध्ये मधमाशांचे पालन करून उत्पन्न वाढवावे, असे आवाहन या शेतकऱ्याने केले आहे. अलीकडे शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन, मत्स्यपालन, कुक्कट पालन आणि आता मधमाशी पालनाकडेही शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे. आपल्या शेतात किंवा परसात मधमाशांसाठी पेटी ठेवून उत्पादन घेऊ शकतो.
विशेषत: मधमाशा पराग कण आणत असल्याने पिकांसाठी ते उपयुक्त ठरते. यासाठी बागायत खात्यामार्फत विशेष प्रोत्साहन आणि सहकार्य केले जाते. शिवाय स्थानिक पातळीवर आपल्याला मध प्राप्त होतो. शेतकऱ्यांनी मधमाशी पालनाकडे वळावे, असे आवाहनही खात्याने केले आहे. बागायत खात्याकडून शेतकऱ्यांना याबाबत मार्गदर्शन करून पेट्या दिल्या जातात. शिवाय मधमाशाही पुरविल्या जातात. विशेषत: बागायती शेती असलेल्या शेतकऱ्यांना मधमाशी पालन करणे सोयीस्कर होते. जांबोटी या ठिकाणी मधमाशी प्रशिक्षण केंद्र आहे. मधमाशी पालनाबाबत अधिक माहिती दिली जाते. शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून मधमाशी पालन करून मध उत्पादन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.