हरकुळबुद्रुक सरपंच बंडू ठाकूर यांचा इशारा
कणकवली / प्रतिनिधी
हरकुळ बुद्रुक मध्ये मे 2024 मध्ये वादळी वा-यासह पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप भरपाई मिळालेली नाही. सदरची भरपाई तात्काळ न मिळाल्यास 21 ऑगस्ट रोजी तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा हरकुल बुद्रुक सरपंच आनंद उर्फ बंडू ठाकूर यांनी दिला आहे.जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात श्री ठाकूर यांनी म्हटले आहे की, हरकुळ बुद्रुक गावामध्ये १६ मे २०२४ रोजी झालेल्या वादळी वा-यासह पावसाने अनेक निवासी घरे तसेच गुरांचा गोठा तसेच इतर मालमत्ता यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. ग्रामपंचायत हरकुळ बुद्रुक कडून तसे लेखी पत्र आपले कार्यालयाकडे तात्काळ सादर केलेले आहे. तरी अद्यापपर्यंत सदर नुकसानग्रस्त ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारची मदत अध्यापपर्यंत मिळालेली नाही. सदर नुकसानीची आपण प्रत्यक्ष उपस्थित राहून पाहणी केलेली आहे. तरी सदरची बाब आपण अतिशय गांभीर्याने घेऊन सदर नुकसानीची रक्कम तात्काळ मिळण्याची कार्यवाही शासन स्तरावर पूर्ण न केल्यास नुकसानीच्या रक्कमेसाठी आम्ही नुकसानग्रस्त ग्रामस्थ तहसिलदार तथा दंडाधिकारी यांचे कार्यालयसमोर दिनांक २१ ऑगस्ट २०२४ रोजी धरणे आंदोलन छेडणार असल्याचे म्हटले आहे.