प्रशासनाचे दुर्लक्ष : अपघाताचा धोका
बेळगाव : हंदिगनूर-बोडकेनहट्टी मार्गावर किटवाड क्रॉसनजीक असलेल्या पुलावरील लोखंडी सळ्या बाहेर आल्याने वाहनधारकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. लोकप्रतिनिधी आणि संबंधित खात्याचे दुर्लक्ष झाल्याने हा मार्ग आता मृत्यूचा सापळा बनला आहे. या मार्गावर वर्षभरापूर्वी नव्याने नाल्यावर पूल उभारण्यात आला आहे. मात्र वर्षभरातच पुलावरील सळ्या बाहेर आल्या आहेत. त्यामुळे रात्रीच्यावेळी अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. एका वर्षातच लोखंडी सळ्या बाहेर आल्याने पुलाच्या दर्जाबाबतही प्रश्न उपस्थित होत आहे. तातडीने दुरुस्ती करून रस्ता सुरळीत करावा, अशी मागणीही स्थानिक वाहनधारकांनी केली आहे.
या मार्गावर बोडकेनहट्टी, किटवाड, कुदनूर, कुरिहाळ, कट्टनभावी, दिंडलकोप्प आदी भागात जाणाऱ्या वाहनधारकांची संख्या मोठी आहे. मात्र हंदिगनूर गावाशेजारी असलेल्या पुलावरील लोखंडी सळ्या बाहेर आल्याने हा मार्ग धोकादायक ठरू लागला आहे. विशेषत: रात्रीच्या अंधारात सळ्या दिसत नसल्याने लहान-सहान अपघात घडू लागले आहेत. मोठा अनर्थ घडण्यापूर्वी दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसाने पुलाची दुर्दशा होऊन या सळ्या बाहेर आल्या आहेत. या सळ्यांमध्ये वाहने अडकून पडण्याची भीती व्यक्त होत आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी नव्याने उभारलेल्या पुलावरती ही परिस्थिती निर्माण झाल्याने पुलाच्या कामाबाबतही आता प्रश्न निर्माण होत आहे. एका वर्षातच लोखंडी सळ्या बाहेर आल्याने स्थानिक नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. शिवाय या मार्गावरून आता वाहतूक धोकादायक ठरू लागली आहे.