कारवारच्या घटनेनंतर तरी जाग येणार का? सामान्यांच्या जीवाशी खेळ थांबणार का?
बेळगाव : कारवारच्या काळी नदीवरील चाळीस वर्षांचा जुना पूल कोसळला आहे. त्यामुळे बेळगाव, गोवा, सदाशिवगडहून कारवारला जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. बेळगावसह राज्यातील आणखी किमान दहाहून अधिक पूल धोकादायक अवस्थेत आहेत. त्यामुळे कारवारच्या घटनेनंतर तरी राज्य सरकारला जाग येणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बेळगाव-जांबोटी मार्गावरील कुसमळी पूलही धोकादायक बनला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या मार्गावरील अवजड वाहतुकीला निश्चित वेळ ठरवून दिली आहे. संततधार पावसामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. पालकमंत्री सतीश जारकीहोळी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आदी अधिकाऱ्यांनी या पुलाला भेट देऊन पाहणी केली आहे. काळी नदीवरील पूल कोसळल्यानंतर धोकादायक पुलांविषयी सरकारने खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. कर्नाटकात यंदा उत्तम पाऊस पडला आहे. ऑगस्ट सुरू होण्याआधीच राज्यातील बहुतेक जलाशये तुडुंब भरली आहेत. कर्नाटकातील किनारपट्टी व पश्चिम घाट परिसरात मुसळधार सुरूच आहे. त्यामुळे जुने पूल कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.
बिहारमध्ये केवळ पंधरा दिवसांत बाराहून अधिक पूल कोसळले. कर्नाटकात सध्याच्या माहितीनुसार किमान दहाहून अधिक पूल धोकादायक अवस्थेत आहेत. ऑगस्ट महिन्यातही संततधार सुरूच राहणार, असा हवामान तज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे जुन्या व धोकादायक पुलांवरून वाहतूक करणे जिकिरीचे व जीवघेणे ठरणार आहे. सध्या अनेक जुन्या पुलांवर वाहतूक करताना हादरे बसतात. हे पूल पावसाळ्यात पाण्याखाली जातात. या पुलांची दुरुस्तीही अर्ध्यावर थांबली आहे. मंगळूरजवळील ब्रिटिशकालीन पूलही धोकादायक बनला आहे. एका तज्ञ समितीने या पुलाची पाहणी करून हा पूल वाहतुकीसाठी योग्य नाही, असा अहवाल दिला होता. त्यानंतरही या पुलावरील वाहतूक थांबली नाही. या पुलाशेजारीच नव्या पुलाची उभारणी चार वर्षांपूर्वी सुरू केली असली तरी काम अद्याप अर्धवट आहे. बळ्ळारी, चिक्कमंगळूर, मंगळूर, रायचूर आदी जिल्ह्यातील अनेक पूल धोकादायक अवस्थेत आहेत. कारवार जिल्ह्यातील यल्लापूर तालुक्यातील बेडथी नदीवरील पुलानेही शतक ओलांडले आहे. हा पूल वाहतुकीसाठी योग्य नाही, असा अहवाल दिल्यामुळे शेजारी नवा पूल उभारला. सध्या नव्या पुलावर वाहतूक सुरू असली तरी जुना पूल बंद केलेला नाही.
प्रशासनाने कारवारचा धडा घेतला नाही तर…
बेळगाव तालुक्यातील कंग्राळी खुर्दजवळ मार्कंडेय नदीवर नवा पूल उभारल्यानंतर पावसाळ्यातही या मार्गावरील वाहतूक सुरळीतपणे चालते. पूर्वी पावसाळ्यात किमान 15 ते 20 दिवस पुलावर पाणी आल्याने कडोली, अगसगा, कट्टणभावी, हंदिगनूर, केदनूर, मण्णीकेरी, बंबरगा, देवगिरी, गुंजेनहट्टी आदी गावांतील नागरिकांना काकतीवरून बेळगावला यावे लागत होते. नव्या पुलावर वाहतूक सुरू असूनही जुना पूल अद्याप बंद झालेला नाही. या मार्गावर सेल्फीसाठी जाणाऱ्या तरुणाईची संख्या मोठी असते. प्रशासनाने कारवारचा धडा घेतला नाही तर जुन्या पुलावर वाहतूक करणे धोकादायक ठरणार आहे.