नादुरुस्त रिक्षाला ठोकरून ट्रकही महामार्गावर उलटला
प्रतिनिधी/ बेळगाव
ब्रेक निकामी झाल्याने पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील अलारवाड क्रॉसजवळ रस्त्याशेजारी उभी असलेल्या भाजीवाहू रिक्षाला भरधाव ट्रकची धडक बसून हिरेबागेवाडी (ता. बेळगाव) येथील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. शनिवारी पहाटे ही घटना घडली असून रिक्षाला ठोकरल्यानंतर ट्रकही महामार्गावर उलटला.
अमीनसाब महम्मदअली यरगट्टी (वय 63, रा. मारुती गल्ली, हिरेबागेवाडी) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वृद्ध शेतकऱ्याचे नाव आहे. हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून, पोलीस उपनिरीक्षक अविनाश ए. वाय. व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
अपघातात मृत्युमुखी पडलेले अमीनसाब हे व्यवसायाने शेतकरी होते. आपल्या मुलाच्या मालवाहू रिक्षामधून भाजी घेऊन ते बेळगावला येत होते. अलारवाड क्रॉसजवळ ब्रेक निकामी झाल्याने मुलाने रिक्षा महामार्गाशेजारी थांबविली होती. त्यावेळी अमीनसाब रिक्षातच बसले होते. तर मुलगा खाली उतरून फोनवरून मेकॅनिकशी बोलत होता.
याचवेळी भरधाव ट्रकची रिक्षाला धडक बसून अमीनसाब यांचा मृत्यू झाला. त्यानंतर ट्रकही महामार्गावर उलटला. अमीनसाब यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे. यासंबंधी ट्रक चालकावर एफआयआर दाखल करण्यात आले असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.