गुहागर साखरीआगर येथील घटना; गुहागर पोलिसांकडून तपास सुरू
गुहागर प्रतिनिधी
घरामध्ये खेळता-खेळता पडलेले जेली चाॅकलेट 9 महिन्यांच्या बालकाने खाल्ल्याने हे चॉकलेट न विरघळता थेट अन्ननलिकेमध्ये अडकून यामध्ये श्वास कोंडून 9 महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुहागर तालुक्यातील साखरीआगर कातळवाडी येथील ही घटना असून यामुळे घरातील कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
तालुक्यातील साखरीआगर कातळवाडी येथील पमोद तेरेकर हे मुंबईला कामानिमित्त गेले होते. घरी आई-वडील व त्यांची पत्नी असा परिवार होता. 25 जानेवारी रोजी त्यांचा 9 महिन्यांचा मुलगा रियांश हा नेहमीप्रमाणे जमिनीवर खेळत होता. याचवेळी जमिनीवर पडलेले जेली चाॅकलेट त्याने तोंडात घतले. चाॅकलेटचे कव्हर काढलेले होते, परंतु जेली त्यांच्या अन्ननलिकेमध्येच अडकली. यात रियांशचा श्वास कोंडल्यासारखा झाल्याने घरातील मंडळींनी त्याला नरवण येथील एका खाजगी दवाखान्यात नेले आणि तेथून त्यांनी पुढील उपचारासाठी तातडीने गुहागरमध्ये न्यावयास सांगितले. मात्र गुहागरमध्ये आणत असतानाच रियांशचा मृत्यू झाला. या घटनेची खबर प्रमोद तेरेकर यांना समजताच त्यांना धक्काच बसला. दरम्यान, या घटनेची गुहागर पोलीस ठाण्यात नोंद केली असून 26 जानेवारी रोजी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पवनकुमार कांबळे यांनी केला आहे. तोंडात अडकलेली ही जेली चाॅकलेटच होते. त्याचे कव्हरही बाहेर पडले होते. मुलांची अन्ननलिका लहान असते. यामुळे ही जेली लवकर विरघळत नसल्याने ती अन्ननलिकेमध्ये अडकून श्वास कोंडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे तपासात पुढे आले असल्याचे त्यांनी ‘तरूण भारत’जवळ बोलताना सांगितले.