सेवा केंद्रांवर चार पट जादा आकारणी करण्यात येत असल्याने नागरिकांची लूट
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिका कार्यालयात जन्म व मृत्यू दाखले देण्याचे बंद करण्यात आले आहे. सेवा केंद्रांमधून दाखले घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र सेवा केंद्रांवर प्रत्येक दाखल्यासाठी 50 रुपये आकारण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. तब्बल चार पट जादा पैसे आकारण्यात येत असल्याने नागरिकांची लूट होत आहे. त्यामुळे मनपा आरोग्य अधिकारी आणि सेवा केंद्र चालकांच्या संगणमताने हा दर आकारण्यात येत आहे का? असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
जन्म-मृत्यू झाल्यास त्याची नोंद महापालिकेत केली जाते. अलीकडे जन्म-मृत्यू दाखल्याचे संगणकीकरण करण्यात आल्याने खासगी रुग्णालयातील जन्म-मृत्यू नेंद ऑनलाईनद्वारा केली जात आहे. कागदपत्रांची शहानिशा करून महापालिकेकडून अप्रुव्हल दिले जाते. त्यानंतर जन्म दाखल किंवा मृत्यू दाखल वितरित केला जातो. यापूर्वी खासगी रुग्णालयातील जन्म-मृत्यूची नोंद महापालिकेच्या कर्मचाऱयांना करावी लागत असे. पण अलीकडे कामाचा ताण कमी होवून देखील जन्म-मृत्यू दाखले वितरण करण्याचे महापालिका कार्यालयात बंद करण्यात आले आहे. शहर आणि उपनगरातील सेवा केंद्रांवर जन्म-मृत्यू दाखले घेण्याची सूचना करण्यात येत आहे. त्यामुळे महापालिकेत येणाऱया नागरिकांना सेवा केंद्रांवर धाव घ्यावी लागत आहे.
चार पटीने जादा पैशांची आकारणी
महापालिकेत एका जन्म-मृत्यू दाखल्यासाठी पहिल्या प्रतिकरिता 10 रुपये आणि त्यावरील प्रत्येक प्रतिला 5 रुपये प्रमाणे दर आकारण्यात येतो. मात्र सेवा केंद्रांवर एका प्रतिसाठी 50 रुपये वसूल केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. पहिली प्रत 50 रुपये आणि त्यावरील प्रत्येक प्रतिसाठी 10 रुपये आकारण्यात येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना नागरिकांकडून जन्म-मृत्यू दाखल्यासाठी सेवा केंद्रांवर चार पटीने जादा पैशांची आकारणी केली जात असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. महापालिकेत दाखल्याची मागणी केली असता, याठिकाणी दाखल देण्याचे बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र ही माहिती देण्याकरिता महापालिकेने जन्म-मृत्यू दाखला कक्षासमोर दोन कर्मचाऱयांची नियुक्ती केली आहे. तसेच त्या कर्मचाऱयांसोबत सेवा केंद्रावरील कामगार ठाण मांडून बसत आहे.
एजंटांच्या संख्येत वाढ
महापालिकेत दाखले विचारण्यासाठी येणाऱया नागरिकांना दाखले देण्याचे सांगून संगणक केंद्रांवर घेवून जात आहेत. त्यामुळे महापालिका कार्यालय आवारात एजंटांची संख्या वाढली आहे. शहरात आणि उपनगरातील सेवा केंद्रांवर 50 रुपये आकारण्यात येत असल्याने नागरिकांची लूट होत आहे. 10 रुपयांत उपलब्ध होणाऱया जन्म-मृत्यू दाखल्यासाठी एजंट आणि सेवा केंद्रांमुळे 50 रुपये मोजावे लागत आहेत. तसेच चुकीच्या दुरुस्तीसाठी हजारो रुपये वसूल करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबतची तक्रार महापालिका आयुक्त रुदेश घाळी आणि आरोग्य अधिकारी डॉ. संजय डूमगोळ यांच्याकडे करण्यात आली होती. तसेच महापालिका कार्यालयात दाखले वितरण सुरू ठेवावे, अशी विनंती करण्यात आली होती. एका दाखल्याच्या प्रतिसाठी 30 रुपयांपर्यंत आकारण्याची मुभा असल्याचे सांगून आयुक्त आणि आरोग्य अधिकाऱयांनी या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी सेवा केंद्रांवर जादा पैशांची आकारणी केली जात आहे. दररोज शेकडो दाखले घेण्यात येतात. त्यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. महापालिकेचे अधिकारी आणि सेवा केंद्र चालकांच्या संगणमताने दाखल्यांसाठी जादा रकमेची आकारणी केली जात आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळेच महापालिकेत दाखले देण्याचे बंद करण्यात आल्याचा आरोपही होत आहे.