‘मशाल’ चिन्हासंबंधी दाखल केली होती याचिका
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला ‘मशाल’ निवडणूक चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील समता पक्षाची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. याचिकाकर्त्याच्या पक्षाची मान्यता 2004 मध्ये रद्द करण्यात आली होती, असे न्यायाधीश संजीव नरुला यांनी स्वतःच्या निर्णयात नमूद केले आहे. ‘मशाल’ हे आमचे निवडणूक चिन्ह असून पक्षाने या चिन्हावर निवडणूक लढविली असल्याचा दावा समता पक्षाकडून करण्यात आला होता.
‘मशाल’ एक आरक्षित निवडणूक चिन्ह आहे आणि ते ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाला प्रदान करण्यापूर्वी यासंबंधी एक अधिसूचना करत हे चिन्ह ‘मुक्त’ करण्यात आल्याचे जाहीर करणे गरजेचे होते, असा दावा करत याचिकाकर्त्याने निवडणूक आयोगाच्या 10 ऑक्टोबर रोजीच्या आदेशाला आव्हान दिले होते. समता पक्षाने 2014 ची लोकसभा निवडणूक ‘मशाल’ या निवडणूक चिन्हावरच लढविली होती, असा दावा याचिकाकर्त्याचे वकील कमलेशकुमार मिश्रा यांनी केला.
निवडणूक आयोगाच्यावतीने वकील सिद्धांत कुमार यांनी या चिन्हाचे वाटप करण्याच्या निर्णयाचा बचाव केला. तसेच कायद्यांतर्गत चिन्ह वाटप आदेशापूर्वी कुठलीच अधिसूचना जारी करण्याची गरज नसते. याचिकाकर्त्याच्या पक्षाची मान्यता 2004 मध्येच रद्द करण्यात आली होती. सध्या या निवडणूक चिन्हावर याचा कुठलाच अधिकार नसल्याचा युक्तिवाद निवडणूक आयोगाकडून करण्यात आला.