आसामच्या नलबारी महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र शिकणाऱ्या राजदीप काश्यप नामक युवकाने एक अद्भूत विक्रम केला आहे. त्याने अवघ्या 9 तासांमध्ये 84 पृष्ठांचे एक पुस्तक लिहीले आहे. याचाच अर्थ असा की त्याने एका तासात 8.4 पृष्ठे या वेगाने हे पुस्तक लिहून हातावेगळे केले. त्याच्या विक्रमाची नोंद गिनीज विक्रम पुस्तिकेत करण्यात आली आहे. या पुस्तकाचे नावही लांबलचक आहे. ‘जन्मो-प्रेम-मृत्यू….किसू बोग्यानिक, किसू अलौकिक’, हे या पुस्तकाचे नाव आहे.
सर्वसामान्य माणसाकडून कोणत्याही सर्वसामान्य आकाराच्या पुस्तकाची साडेआठ पाने एका तासात वाचूनही होणार नाहीत. पण या युवकाने त्या वेगाने ती लिहिली आहेत. हा विक्रम प्रस्थापित करण्यासाठी त्याला बरेच कष्ट पडले. गिनीज विक्रम पुस्तिकेच्या व्यवस्थापकांना या पुस्तक लिहिण्याचा व्हिडीओ पुरावा हवा होता. त्यामुळे काश्यप याला तशी व्यवस्था करावी लागली. व्हिडीओ कॅमेऱ्यासमोर विश्वासार्ह साक्षीदारांसमोर त्याला या पुस्तकाचे लेखन करावे लागले. याकामी त्याला त्याच्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी मोठे साहाय्य केले. त्याने कृतज्ञतापूर्वक या साहाय्याचा आणि इतरांनीही दिलेल्या सहकार्याचा उल्लेख केला आहे. हे पुस्तक अद्याप प्रकाशित झालेले नाही. तथापि, ते जन्म, प्रेम आणि मृत्यू या मानवी जीवनातील तीन सत्यांचे भावनात्मक, तात्विक आणि वैज्ञानिक पैलू स्पष्ट करणारे आहे, अशी माहिती राजदीप काश्यप याने स्वत: दिली आहे.