प्रतिनिधी /पणजी
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा प्रत्येक भारतीयाच्या जीवनाला स्पर्श करणारा आहे. त्याचबरोबर सामाजिक न्याय आणि समानतेला प्रोत्साहन देणारा, व समाजातील प्रत्येक घटकांच्या कल्याणाची काळजी घेऊन त्यांना समान संधी प्रदान करणारा आहे, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी केले. शुक्रवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार दयानंद सोपटे, सीए जयराम खोलकर, प्रवक्ता गिरीराज वेर्णेकर, आदींची उपस्थिती होती.
गरीबांचे हित पाहणारा अर्थसंकल्प
भारतातील अमृत कालचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे, जो लोककल्याणकारी आणि गरीबांना हित प्रदान करणारा आहे. हा अर्थसंकल्प सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग तसेच कृषी, मासेमारी, सहकार आणि मध्यमवर्गावर भर देणारा आहे. त्याद्वारे सर्वांचा विकास समाविष्ट आहे, असे ते पुढे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेचा हा अर्थसंकल्प असून त्यात शिक्षण, कौशल्य विकास तसेच पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात आला आहे, हे या सरकारचे वैशिष्ट्या आहे, असेही ते म्हणाले.
पगारदार व मध्यमवर्गीयांसाठी वरदान
नवीन प्राप्तिकर प्रणाली अंतर्गत 7 लाख पर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर आकारला जाणार नाही, हे पगारदार व मध्यमवर्गीयांसाठी वरदान आहे. गोव्यात समान नागरी कायदा असल्यामुळे खास करून गोमंतकीय व्यावसायिकांना या नवीन करप्रणालीचा दुप्पट लाभ होईल, असे त्यांनी सांगितले.
आर्थिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल
मुलांचे शिक्षण, मध्यमवर्गीयांची कमाई आणि वृद्धांचे कल्याण यावर भर देणारा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामुळे भारताची वाटचाल आर्थिक महासत्तेच्या दिशेने होत असल्याचेही तानावडे म्हणाले.
देशभरात 50 विमानतळ उभारणार
अर्थसंकल्पात विविध ठिकाणी हॅलिपॅड, नर्सिंग महाविद्यालये, एकलव्य मॉडेल स्कूल आदींची घोषणा करण्यात आली आहे. भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर ठिकठिकाणी नवीन विमानतळे बांधण्यात येत असून गोव्यातही मोप विमानतळाचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले आहे. त्याशिवाय 50 अतिरिक्त विमानतळे बांधण्यात येणार असल्याचे तानावडे यांनी सांगितले.