डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा आला की वर्तमानपत्रातून सगळय़ांचे निरोप घेणारे लेख सुरू होतात. अगदी निरोपाचे विडे द्यावे त्याप्रमाणे. अनेक ठिकाणी नववर्षाची तयारी सुरू होते. मागचे संकल्प पूर्ण झाले की नाही याचा आढावा घ्यायला सुरुवात होते. तेव्हा आपल्या लक्षात येतं, की आता आपण जे नवीन वर्षासाठी संकल्प करणार आहोत ते मागच्यापेक्षा वेगळे असणार. कारण आपण कायमच तुलनात्मक जीवन जगत असतो. नवीन वर्षासाठी कोणता संकल्प करायचा, गावाला जायचं, काय बघायचं, काय वाचायचं, कोणता व्यायाम करायचा, कशी बचत करायची अशा अनेक गोष्टींची यादी तयार होते. अगदी नवीन शाळेत निघालेल्या मुलासारखी आमची अवस्था होते. पण प्रत्येक क्षण प्रत्येक वर्ष ही आपल्या जगण्याची एक प्रकारची पाठशाळाच असते. प्रत्येक क्षणाची अनुभूती वेगळी असते. काही वेळेला काही क्षण परीक्षा घेणारे ठरतात परंतु पुढच्या क्षणांकडे कसे बघायचे याचा दृष्टिकोन ते देवून जातात. म्हणूनच अशा नव्या वर्षांचे संकल्प आपल्याला खूप उपयोगी पडतात. आमच्या मागच्या वागण्याचा, घडलेल्या घटनांचा आढावा खरं म्हणजे आपण घेत असतो आणि नवीन संकल्प करताना या सगळय़ा विचारांनी अंतर्मुख होत असतो. बरेच जण डायरी लिहितात. डायरी वाचत असताना या डायरीतल्या पानांमध्ये खाडाखोड करण्यापेक्षा किंवा पान फाडण्यापेक्षा या डायरीला नवीन पानं जोडणं महत्त्वाचं ठरतं. आमच्या मनाची अशीच एक डायरी असते. त्या डायरीचा कॅनव्हास किंवा कागद हा कोरा असायला लागतो. त्यासाठी आपल्याला आपल्या मनावर साठलेली मरगळ, जळमटं किंवा वाईट गोष्टी कायम झटकायला लागतात. त्याच्यासाठीचा हा क्षण म्हणजे वर्षारंभ. आठवणी झटकत असताना लक्षात येतं, की चांगली आठवण ठेवावी अशी माणसं लक्षात येताना, टोचणी देणारी किंवा दुःख देणारी माणसंसुद्धा त्याला जोडूनच आलेली असतात. अशावेळी या माणसांना टाकून देऊन चालत नाही तर त्यांच्यासह आपलं चित्र पूर्ण करायला लागतं. आपल्या या चित्रात त्यांची जागा किनाऱयाइतकीच. त्यामुळे डोळय़ांना आणि मनाला सुखावणाऱया गोष्टीचे प्रसंग जास्त सुस्पष्ट दिसायला लागतात. आणि लक्षात येतं, आतापर्यंत आपण नेमके कोणकोणते रंग उधळलेत, कोणते रंग काटकसरीने वापरलेत किंवा जपलेत हे स्पष्ट जाणवायला लागतं. आपल्या स्वभावानुसार त्या रंगछटा खरं म्हणजे तिथे उमटलेल्या असतात. उथळ विचारांचे, भडकण्याचे, प्रेमाचे, संशयाचे, फसवल्याचे, अपराधीपणाचे, कितीतरी रंग अस्ताव्यस्त पडलेले दिसतात. अशा या कॅनव्हासमध्ये एखादा कोपरा अलिप्तपणे स्वच्छ ठेवायला हवा. अगदी ऍबस्ट्रक पेंटिंगसारखा. बरेचदा अशा मोकळय़ा जागा अर्थवाही ठरतात. कविता शब्दांचे रंग पेलत असतात पण त्यातले कितीतरी विषय अप्रत्यक्षपणे त्या खांद्यावर पेलत असतात. तसंच आपल्या आयुष्याचे चित्र, प्रत्येक क्षणाला नवीन रंगात नाहून येतं. आम्ही मात्र मनात धरून ठेवलेला रंग शोधण्यासाठी असे वर्षारंभ हेरून ठेवतो. नवीन कॅनव्हास कोणकोणत्या रंगांचा चित्राचा असावा याचे एक संकल्पचित्र आमच्या मनामध्ये रेखून ठेवतो. बरेचदा इंग्रजी नववर्षापेक्षा आपले हिंदू नववर्ष का नाही? असेही प्रश्न समोर येतात आणि मग लक्षात येतं, की नव वर्ष निसर्गातसुद्धा चालू असतोच की. त्याला त्याच्या चक्रानुसार चैत्र पालवीची पल्लवीत होणारी पानं, श्रावणात रुजणारी पानं, वसंतात बहरणारी झाडं, हेमंतात गारवा देणारं वातावरण तर शिशिरामधली पानगळती ह्या सगळय़ा झाडांचे कॅनव्हास म्हणजे फांद्यांना रिकामा करत असते किंवा स्वच्छ करत असते. निळय़ा आकाशाला या ओबडधोबड फांद्या जणू तोलून धरतायेत, असं आपल्याला वाटतं. या निष्पर्ण फांद्यांचेसुद्धा एक सुंदर चित्र तिथे तयार होतं. असा हा शेवटचा महिना नवीन पानांसाठी जशी जागा कोरी करून ठेवतो, तसंच आपणही जुन्या, निरुपयोगी गोष्टी, आवरणं काढून टाकून नवीन क्षणांना सामोरे जायला हवं. आपला प्रत्येक श्वाससुद्धा नवा आरंभ असतो. त्या क्षणाची जगण्याची संकल्पचित्रे रंगवण्यासाठीचे आपल्या मनाचे कॅनव्हास आम्हाला स्वच्छ करायला हवे.
अशा या अंधाराच्या रात्री आणि कडाक्मयाची थंडी आम्हाला आणि आमच्या त्या संकल्पचित्राला कल्पनेतून यायला, व्यक्त व्हायला मदत करत असते. आम्ही जेव्हा डोळे मिटतो तेव्हा अंधारून येतं. पण हाच अंधार रंगीबेरंगी स्वप्न देत असतो, तसं काहीसं ह्या नवीन येणाऱया वर्षाबद्दल असतं. म्हणून या सगळय़ा नवीन वर्षाचे स्वागत आपण आनंदाने करायला हवं.