दोघांना सात दिवसांची कोठडी, तिघे जण अद्याप फरार,
प्रतिनिधी /वास्को
बायणात सोमवारी दुपारी झालेल्या उमेश हरीजन या युवकाच्या खून प्रकरणातील अन्य संशयीत आरोपींचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. पोलिसांनी या खून प्रकरणी बायणातील पाच युवकांविरूध्द खूनाचा गुन्हा नोंद केलेला असून या प्रकरणी दोघांना घटनेनंतर काही तासांतच अटक करण्यात पोलिसांना यश आले होते. त्या दोघांना सात दिवसांच्या रिमांडवर पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. अन्य तीन संशयीत आरोपींचा शोध जारी आहे.
उमेश हरीजन या युवकाचा खून पूर्ववैमनस्यातूनच झाल्याचे स्पष्ट झालेले आहे. टोळक्याने हा खून केलेला असला तरी हा टोळीयुध्दाचा प्रकार नसल्याचे पोलीस उपअधीक्षक राजेशकुमार यांनी म्हटले आहे. दोघा तिघां व्यक्तींमधील दुश्मनीतूनच हा खूनाचा प्रकार घडल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणातील दीपक साहनी व आमीर हुसैन या दोघांना अटक करण्यात यश आलेले असले तरी अद्याप परशुराम उर्फ पर्शा दोड्डामणी, जुम्मन व दुर्गे आलम असे तिघे जण पोलिसांच्या हाती लागू शकलेले नाहीत. या प्रकरणातील सर्व युवक 28 ते 32 वयो वर्ष गटातील असून त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे. ते गोव्यातच लपून बसले असण्याची शक्यता आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी नाका बंदी जारी केलेली असून कोम्बींग ऑपरेशन सुरू करण्यात आलेले असल्याचे पोलीस उपअधीक्षक राजेशकुमार यांनी म्हटले आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांना मंगळवारी येथील प्रथम श्रेणी न्यायालयात उभे करून त्यांच्यासाठी सात दिवसांच्या पोलीस कोठडीचा रिमांड घेण्यात आला.
पूर्ववैमनस्य आणि पूर्वनियोजनातूनच खून
उपलब्ध माहितीनुसार दोघा तिघांमधील दुश्मनीतूनच हा खूनाचा प्रकार पूर्वनियोजतपणे घडलेला आहे. मागच्या दोन वर्षांत त्यांच्यामध्ये अनेक वेळा खटके उडणे, मारहाण होणे किंवा मारहाणीचे प्रयत्न होणे असे प्रकार घडलेले असून त्यांच्या वादातील घटना पोलिसांपर्यंतही पोहोचल्या होत्या. खून केलेल्या टोळक्याने मयत उमेश याचा इक्बाल म्हणून ओळखल्या जाणाऱया भावाला लक्ष्य केले होते. यापूर्वी इक्बालवर हल्ला झाला होता. मात्र, त्यांच्या हल्ल्यातून तो बचावला होता. उमेशवर झालेला खूनी हल्ला हा पूर्वनियोजित होता. एका कारमधून हत्यारे घेऊनच ते घटनास्थळी दाखल झाले होते. शेवटी उमेश त्यांच्या तावडीत सापडल्याने त्याचा जीव गेला.
बायणाच्या या वस्तीत पंधरा वर्षापूर्वी अशा घटना घडायच्या
या घटनेमुळे बायणातील पंधरा वर्षांपूर्वीच्या गुन्हेगारी घटनांच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. पूर्वी याच ठिकाणी वेश्यावस्ती होती. त्या ठिकाणी ऐकमेकांवर हल्ले व्हायचे व त्यात युवकांचे खूनही व्हायचे. त्याच जागी पुन्हा त्याच प्रकारची घटना घडल्याने बायणातील या काटे बायणा भागात अजूनही गुन्हेगारी वृत्ती जीवंत असल्याचे दिसून येत आहे. अजूनही या भागात गुन्हेगारीच्या घटना घडत असतात. मात्र, सुरे व कोयत्याने एखादय़ा टोळीकडून एखादय़ाचा खून करण्याची घटना बऱयाच खंडानंतर या भागात घडलेली आहे.
मयत युवकाविरूध्दही गुन्हेगारी प्रकरणांची नोंद
पोलीस उपअधीक्षकांनी उघड केलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात मृत्यू आलेला उमेश हरीजन हासुध्दा काही गुन्हेगारी प्रकरणात अडकलेला आहे. त्याच्याविरूध्द चार गुन्हेगारी प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत. तर या प्रकरणात अटक करण्यात आलेला एक संशयीत आरोपी आमीर हुसैन याच्याविरूध्द दोन गुन्हेगारी प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत.
काटे बायणात साडे तीन महिन्यातील दुसरा खून, पहिल्या खूनातील आरोप मोकाट
दरम्यान, काटे बायणातील समुद्र किनारी भागात मागच्या साडे तीन महिन्यात घडलेली खूनाची ही दुसरी घटना आहे. याच वस्तीपासून काही अंतरावर मे महिन्यात कायतान उर्फ कांसी डिसोजा या नागरीकाचा एका अज्ञात युवकाने त्याच्याच घरात खून करून त्याच्या घरातील रोख व सोन्याचे दागिने मिळून लाखो रूपयांचा ऐवज पळवला होता. तो संशयीत आरोपी दोन दिवस मयत कायतान याच्या सहवासात होता. मात्र, तो कायतानचा खून पसार होईपर्यंत त्याला कुणीच पाहिले नाही. मयत कायतान व्यतिरीक्त त्याला कोणीच ओळखत नव्हता. त्या युवकाचे सीसीटीव्ह फुटेज पोलिसांना मिळाले होते. मात्र, त्याचा ठावठिकाणा पोलिसांना अद्याप लागलेला नाही. त्या खूनानंतर सोमवारी दुपारी झालेल्या उमेश हरीजन याच्या निघृणरीत्या झालेल्या खुनामुळे बायणा भागात खळबळ उडाली.