शाहबाज शरीफ नवे पंतप्रधान : शपथ देण्यापूर्वी राष्ट्रपती आरिफ अल्वींची तब्येत बिघडली
इस्लामाबाद / वृत्तसंस्था
पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत सोमवारी पुन्हा एकदा नाटय़मय घडामोडी घडल्या. नवा पंतप्रधान निवडण्यासाठी मतदान घेण्याची तयारी सुरू असतानाच इम्रान खान यांच्या ‘पीटीआय’ पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमोदवार शाह मेहमूद कुरेशी यांनी निवडणूक न लढविण्याची घोषणा केली. तसेच मतदानादरम्यान ‘पीटीआय’च्या सदस्यांनी सभागृह कामकाजावर बहिष्कार घातल्याने ‘पीएमएल-एन’चे शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे 23 वे पंतप्रधान बनले. सायंकाळी त्यांची निवड झाल्यानंतर रात्री 8 वाजता ते पंतप्रधानपदाची शपथ घेणार होते. मात्र, पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी प्रकृती अस्वास्थ्यानंतर अचानक रजेवर गेल्याने ते देशाचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना शपथ देऊ शकले नाहीत.
सोमवारच्या पंतप्रधान निवडीच्या प्रक्रियेदरम्यान पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफच्या (पीटीआय) सर्व खासदारांनी संसद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता पाकिस्तानमध्ये ‘शाहबाज युग’ सुरू झाले आहे. पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीने शाहबाज शरीफ यांची पंतप्रधान म्हणून निवड केली आहे. कालपर्यंत शाहबाज शरीफ हे पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये विरोधी पक्षनेते होते, मात्र आजपासून शाहबाज ‘वझीर-ए-आझम’ अर्थात पंतप्रधान झाले आहेत.
असेंब्लीतील मतदानापूर्वी पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) सर्व खासदार सभागृहातून उठून निघून गेले. त्यानंतर उपसभापती कासिम सूरी यांनीही राजीनामा देत खुर्ची सोडली. यानंतर शाहबाज शरीफ यांच्या पीएमएल-एनचे ज्ये÷ खासदार सभापतींच्या खुर्चीवर बसले. यादरम्यान नवा पंतप्रधान निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली. इम्रानचा पक्ष आणि मित्रपक्षांनी आधीच बहिष्कार टाकल्यामुळे शाहबाज यांच्याशिवाय अन्य कोणीही उमेदवार पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नव्हता. मात्र, इम्रानच्या पक्षाने आधीच आपल्या काही खासदारांना गॅलरीत ठेवल्यामुळे ते लोक सतत घोषणाबाजी करत होते. मात्र, गडबड-गोंधळामुळे त्यांना गॅलरीतून बाहेर काढण्यात आले.
बिलावल भुट्टोंकडून शाहबाज यांचे अभिनंदन
पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल बिलावल भुट्टो झरदारी यांनी शाहबाज यांचे अभिनंदन केले. शाहबाज यांच्या सरकारसमोर मोठी आव्हाने आहेत. पण त्यांना खूप खूप शुभेच्छा. तसेच आपली बांधिलकी पूर्ण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या पंतप्रधानांना आम्ही हटवले. आता देश निवडणूक सुधारणा, लोकशाहीची पुनर्स्थापना आणि सर्वांसाठी समृद्धीकडे वाटचाल करेल, असेही ते पुढे म्हणाले.
शाहबाजनी आळवला पुन्हा काश्मिरी राग
पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर शाहबाज शरीफ यांनी पुन्हा एकदा काश्मीरचा राग आळवला आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर जुने सरकार (इमरान सरकार) कोणतीही कारवाई करण्यात अपयशी ठरले आहे. तथापि, आम्हाला भारतासोबत चांगले संबंध हवे आहेत, पण काश्मीर प्रश्न सोडवल्याशिवाय हे होऊ शकत नाही. आम्ही तेथील लोकांना सोडू शकत नाही, आम्ही काश्मिरी जनतेला नैतिक आणि राजनैतिक पातळीवर पाठिंबा देत राहू, असे शाहबाज म्हणाले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेत शाहबाज शरीफ यांनी ‘…हा प्रश्न काश्मिरी जनतेच्या इच्छेने सोडवण्यात यावा’ असा माझा त्यांना संदेश असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोण आहेत शाहबाज शरीफ?
शाहबाज शरीफ हे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा पक्ष असलेल्या पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाझचे (पीएमएल-एन) अध्यक्ष आहेत. तसेच ते पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे भाऊही आहेत. 2018 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पीएमएल-एनने शाहबाज यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले होते. तथापि, इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. शाहबाज पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत.
व्यावसायिक कुटुंबात जन्म
शाहबाज शरीफ यांचा जन्म पाकिस्तानच्या एका . व्यापारी कुटुंबात झाला. डेली टाईम्स वेबसाईटनुसार, ते मूळचे काश्मिरी पंजाबी आहेत. ते जम्मू-काश्मीरच्या मिया जातीशी संबंधित आहेत. 1985 साली लाहोर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या अध्यक्षपदी त्यांनी निवड झाली. 1988 साली ते पंजाब विधानसभेत निवडून आले. पण विधानसभा बरखास्त झाल्याने त्यांचा कार्यकाळ ते पूर्ण करू शकले नाहीत. यानंतर त्यांनी राष्ट्रीय राजकारणात पाऊल ठेवले. 1990 मध्ये पाकिस्तान संसदेच्या नॅशनल असेंब्लीवर ते निवडून आले. त्यावेळी नवाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान होते. नवाज शरीफ जेवढा वेळ पंतप्रधान राहिले तेवढाच वेळ शाहबाज शरीफ नॅशनल असेंब्लीत राहू शकले. त्यानंतर इम्रान खान पंतप्रधान झाल्यानंतर ते विरोधी पक्षनेते होते.
मनी लाँडरिंगचे आरोप
पाकिस्तानचे वृत्तपत्र डॉनच्या वेबसाईटनुसार, 2020 मध्ये शाहबाज शरीफ यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांना मनी लाँडरिंग प्रकरणात अटक झाली. जवळपास 7 महिने ते लाहोरच्या कोट लखपत सेंट्रल जेलमध्ये होते आणि त्यानंतर ते बाहेर आले. सध्या मनी लाँडरिंग प्रकरणात न्यायालयीन सुनावणी सुरू असून या महिन्याच्या अखेरीस त्याची सुनावणी होणार आहे.