भात पिकांचे नुकसान : शेतकरी मेटाकुटीला, वनखात्याने बंदोबस्त करण्याची मागणी
वार्ताहर/जांबोटी
चिखले (ता. खानापूर) येथे गेल्या चार दिवसांपासून गव्याच्या कळपाने धुमाकूळ घातला असून सदर गवे सायंकाळी शेतवडीत घुसून पिकांचे नुकसान करीत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांसह शेतकरी वर्गात घबराट पसरली असून वनखात्याने गव्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.भीमगड अभयारण्याच्या व्याप्तीतील चिखले गावात बिबट्या, अस्वल, वाघ, गवे आदी जंगली प्राण्यांचा उपद्रव वाढल्यामुळे शेतकरी तसेच ग्रामस्थ जीव मुठीत घेऊन जीवन जगत आहेत. गेल्या चार दिवसांपासून येथे दहा-बारा गव्यांच्या कळपाने धुमाकूळ घातला आहे. या गव्यांचे वास्तव्य चिखले-पारवाड रस्त्यानजीकच्या जंगलात असून ते सायंकाळी शेतवडीत प्रवेश करून भात, नाचणा तसेच इतर पिके फस्त करीत असल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल बनले आहेत. येथे ठाण मांडलेल्या गव्यांनी संजय पाटील, रुपेश पाटील आदींच्या भात, नाचणा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. शेतकरीवर्ग रात्रीच्या वेळी गव्यांना हुसकावण्यासाठी विविध उपाययोजना करीत असले तरी गव्यांचे कळप कोणत्याच प्रतिकाराला जुमानत नसल्यामुळे गावातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
नुकसानभरपाई मंजूर करा
कणकुंबी व जांबोटी विभागाच्या वनक्षेत्रपालांनी लक्ष घालून पश्चिम भागात धुमाकूळ घालणाऱ्या गव्यांच्या कळपांचा व हत्तीचा बंदोबस्त करण्यात यावा व नुकसानीची पाहणी करून शेतकरी वर्गांना आर्थिक नुकसानभरपाई मंजूर करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.