राहूल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी या आडनावावरून केलेल्या टिकेवर खटला दाखल झाल्यानंतर त्यांना दोन वर्षांची शिक्षा झाली. राहूल गांधींना झालेल्या शिक्षेनंतर लोकसभेतील संसदीय सचिवालयाने त्यांची खासदारकी रद्द केली. सचिवालयाच्या या निर्णयानंतर देशभरात कॉंग्रेससह त्याच्या सहकारी पक्षांनी या गोष्टीचा निषेध केला. देशातील राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. वंचित बहूजन आघाडीचे (VBA) प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी या निर्णयामागे द्वेष भावना असल्याचे म्हटले आहे.
एका व्हिडिओद्वारे राहूल गांधींच्या रद्द झालेल्या खासदारकीवर आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले, “सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. तसेच, उच्च न्यायालयात अपील करण्याची मुभा दिलेली असून राहुल गांधींनी उच्च न्यायालयात अपील करण्याचं जाहीर केलं आहे. असे असताना भाजपच्या सरकारने तातडीने त्यांची खासदारकी रद्द करणे चुकीचे आहे. भाजपच्या या कृतीचा आम्ही निषेध करतो.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “सरकारने किमान उच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वाट बघायला पाहिजे होते. उच्च न्यायालयाने तो निर्णय रद्द केला नाही तर सरकारने आपला अधिकार वापरणे हे योग्य झालं असतं. सरकारच्या या निर्णयामागे केवळ द्वेष भावना असल्याचे दिसत आहे,” असे मत त्यांनी मांडले आहे.