प्रतिनिधी /फोंडा
गोमंतक भंडारी समाजाच्या केंद्रीय समितीच्या पदाधिकाऱयांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची सदिच्छा भेट घेतली. संघाच्या अखिल भारतीय समन्वय बैठकीसाठी भागवत हे नागेशी-फोंडा येथे आले होते. या दरम्यान भंडारी समाजाच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली.
मोहन भागवत व भंडारी समाजाच्या पदाधिकाऱयांमध्ये साधारण पंधरा मिनिटे चर्चा झाली. या चर्चेदरम्यान भागवत यांनी गोव्यातील भंडारी समाजाविषयी माहिती जाणून घेतली. भंडारी हा गोव्यातील मूळ रहिवासी व भूमीपुत्र आहे. राज्याच्या एकूण लोकसंख्येते हा समाज साठ टक्के आहे. सुरुवातीच्या काळात कष्टकरी समाज म्हणून भंडारी लोकांनी येथे शेती व बागायती वसविल्या. गोवामुक्ती लढय़ात योगदान देतानाच पोर्तुगीजांच्या जुलूमी अत्याचारांचा प्रतिकार करीत येथील धर्म व संस्कृतीचे रक्षण केले. मुक्तीनंतरच्या पर्वात गोव्याच्या विकासामध्येही भंडारी समाजाने महत्वपूर्ण वाटा उचलला. शैक्षणीक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात नेतृत्व करतानाच उल्लेखनीय कार्य केले. तरीही या समाजाला आरक्षण व इतर हक्क मिळविण्यासाठी आजही संघर्ष करावा लागत आहे. शैक्षणीक व राजकीय आरक्षणांमध्ये त्याला योग्य न्याय मिळत नाही. भंडारी समाजाच्या या काही प्रलंबित प्रश्नांकडे शिष्टमंडळाने भागवत यांचे वेधले.
गोमंतकीय समाजाच्या उत्कर्षासाठी व राष्ट्रकार्यासाठी भंडारी समाजाने संघटीत आणि समर्पित भावनेने कार्य करावे, अशा शुभेच्छा भागवत यांनी दिल्या. या शिष्ट मंडळात भंडारी समाजाच्या केंद्रीय समितीचे अध्यक्ष अशोक नाईक, सचिव कृष्णकांत गोवेकर, महिला अध्यक्ष संध्या पालयेंकर व मुरगांव नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अमेय चोपडेकर यांचा समावेश होता.