पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून प्रचारसभा संबोधित ः भगवान सोमनाथाचे घेतले दर्शन
वृत्तसंस्था/ वेरावल
गुजरात निवडणुकीकरता सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला वेग दिला आहे. भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने पूर्ण शक्तिनिशी प्रचार चालविला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी गुजरातमध्ये 4 प्रचारसभा घेत भाजपच्या बाजूने वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे. विकसित अन् समृद्ध गुजरात निर्मिती हेच भाजपचे लक्ष्य असल्याचे विधान मोदींनी प्रचारसभेत केले आहे. तत्पूर्वी पंतप्रधानांनी सोमनाथ मंदिरात दर्शन घेतले आणि पूजा केली आहे. वेरावल येथील सभेला त्यांनी ‘जय सोमनाथ’ या नाऱयासह सुरुवात केली. तर गृहमंत्री अमित शाह यांनी तापी आणि नर्मदा जिल्ह्य़ात प्रचारसभा घेतली आहे.
काँग्रेसच्या एका नेत्याला एका महिलेसोबत पदयात्रा करताना पाहिले असेल. ही महिला नर्मदाविरोधी कार्यकर्ता होती. या महिलेने आणि अन्य लोकांनी कायदेशीर अडथळे निर्माण करत सरदार सरोवर प्रकल्प तीन दशकांपर्यंत रोखला होता असे म्हणत मोदींनी अप्रत्यक्षपणे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना लक्ष्य केले आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत मेधा पाटकर यांनी भाग घेतला होता.
अमरेली येथे आल्यावर घरी आल्यासारखे वाटू लागते. गुजरातमधील अमरेली जिल्हा सागरी व्यापाराचे मोठे केंद्र म्हणून उदयास येत आहे. गुजरातमध्ये एकेकाळी कृषी विकासदर उणे होता. आमच्या मेहनतीमुळे आज गुजरातचा विकासदर दुहेरी आकडय़ात पोहोचला आहे. काठियावाड हा भाग पाण्यासाठी एकेकाळी आसुसलेला होता, पाण्यासाठी 2-36 किलोमीटर वणवण भटकावे लागत होते, परंतु आता सरकारने घरोघरी पाणी पोहोचविल्याचे उद्गार पंतप्रधानांनी सभेदरम्यान काढले आहेत.
आमचा गुजरात विकसित आणि समृद्ध व्हावा हेच भाजपचे लक्ष्य आहे. आमच्या दोन दशकांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे भाजपला जनतेचा अपार आशिर्वाद मिळत आहे. गुजरात आता एक पर्यटन स्थळाच्या रुपात विकसित झाले आहे. सोमनाथ मंदिरात आता लाखो भाविक येत आहेत. स्टॅच्यू ऑफ युनिटीला सर्वाधिक संख्येत पर्यटक भेट देत असल्याचा दावा मोदींनी केला.
गुजरातमध्ये पूर्वी लोकांना पाण्यासारख्या मूलभूत सुविधेपासून वंचित रहावे लागत होते. परंतु आता अनेक योजनांमुळे दुर्गम भागातही पाणी पोहोचले आहे. नल जल योजनेच्या माध्यमातून आम्ही घरोघरी पाणी पोहोचविले आहे. तर उज्ज्वला योजनेमुळे महिलांचे जीवनच बदलून गेले आहे. गुजरातमधील मच्छिमार आता दुप्पट निर्यात करत असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
भाजपचा विजय निश्चित विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित आहे. सर्व मतदानपूर्व सर्वेक्षणं, आकडेवारी आणि वृत्तवाहिन्या यंदा भाजपच विजयी हेणार असल्याचे सांगत आहेत. अधिकाधिक मते आणि अधिकाधिक पोलिंग बूथमध्ये विजय मिळविणे हेच उद्दिष्ट आहे. यावेळी जनतेला मतदानाचा विक्रम मोडीत काढायचा आहे. नरेंद्रचा विक्रम मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मोडावा अशी माझी इच्छा असल्याचे मोदींनी म्हटले आहे.