अध्याय पंचविसावा
भगवंत मनुष्यदेहाचे महत्त्व उद्धवाला पटवून देत होते. ते म्हणाले, थोर असा हा मनुष्यदेह प्राप्त झाल्यावर अखंड ज्ञान संपादन करावं. अर्थातच नरदेह प्राप्त झाला म्हणून ब्रह्मज्ञान आपोआप प्राप्त होत नाही. त्याकरता मी कर्ता आहे हा देहाभिमान सोडून माझेच भजन करावे लागते. मनुष्याचा स्वभाव सत्व, रज आणि तम गुणांनी युक्त आहे हे तुला माहित आहेच. सर्वसाधारण माणसांच्यात रज आणि तम गुण विपुल प्रमाणात असतात आणि त्यामानाने सत्वगुण कमी असतो. सत्वगुण जरी कमी प्रमाणात असला तरी तो चांगल्या सवयींचा पुरस्कर्ता असतो. तो जीवाला माझ्या भजनात गुंतवण्याचा प्रयत्न करतो. ज्याप्रमाणात अनन्यभावाने केलेल्या माझ्या भजनाचा कालावधी वाढत जातो त्याप्रमाणात सत्त्वगुण वाढत जातो आणि आपोआपच रज, तम गुण कमी होत जातात. वाढलेल्या सत्त्वगुणापासून विवेकयुक्त ज्ञान उत्पन्न होते. या ज्ञानामुळे काय चांगले काय वाईट हे लक्षात येऊ लागते. वस्तू आहे तशी दिसू लागली की, त्यानंतर घडणाऱया माझ्या भजनाला अभेदभजन असे म्हणतात. ते केले असता आत्मानंदाचा आस्वाद प्राप्त होतो आणि त्यालाच विज्ञान असे म्हणतात. आत्मानंदाचा आनंद प्राप्त झाला असता गुणांचे कार्यच संपते. त्यामुळे तीनही गुण मिथ्या आहेत असे लक्षात येते. एखादी गोष्ट असली किंवा नसली तरी काहीच फरक पडत नसेल तेव्हा त्याला मिथ्या म्हणतात. आत्मानंदाचा आस्वाद घेत असलेला भक्त त्रिगुणांच्या पलीकडे गेलेला असतो. त्याला गुणांची गरजच नसते. त्यामुळे त्यातलं मिथ्यत्व त्याला जाणवत नसतं. त्याच्या मनात स्वार्थाचा लवलेशही नसतो. नरदेह प्राप्त झाला असता, त्रिगुणातीत अवस्था अनुभवणे, आत्मानंदाचा आस्वाद घेणे हा लाभ प्राण्याला होतो. तो मिळवण्यासाठी मनुष्यदेहामध्ये असलेल्या सर्वानी माझी भक्ती आवश्य करावी. भागवतातील हेच अत्यंत गुह्य ज्ञान होय. ते मुख्यतः भक्तिप्रधान आहे. म्हणून नरदेह प्राप्त झाला असता ज्ञाते लोक माझीच भक्ती करतात आणि माझ्या भजनानेच गुणागुण जिंकून स्वतः परिपूर्ण ब्रह्मस्वरूप होतात. विचारवंताने सावध राहून सत्त्वगुण अंगीकारून रजोगुण आणि तमोगुण यावर विजय मिळवावा. इंद्रियांवर ताबा मिळवावा आणि आसक्ती सोडून माझ्या भजनी लागावे. चित्तवृत्ती शांत करून कोणतीही अपेक्षा न ठेवता सत्त्वगुणावरसुद्धा विजय मिळवावा. तू म्हणशील सत्वगुण तर माणसाला भक्ती करण्याची प्रेरणा देतो मग त्याच्यावर विजय मिळवून काय फायदा? तर त्याचे उत्तर असे की, सत्वगुणाचे आधिक्मय झाले की, माणसाला सात्त्विक अहंकार होतो. त्यामुळे मी सगळय़ात सुखी आहे, मी सगळय़ात ज्ञानी असून श्रे÷ आहे असे त्याला वाटू लागते. एकवेळ रजो किंवा तमोगुणी माणसाचा अहंकार परवडला कारण तो केव्हातरी परिस्थितीचा दणका बसला की कमी होतो परंतु सात्त्विक अहंकार कमी होणे फार अवघड असते. म्हणून सत्वगुणावरही विजय मिळवावा असे मी सांगितले. त्यासाठी आध्यात्मिक साधनेतून मिळणारे सुख आणि ज्ञान मीच त्याला मिळवून दिले आहे हे त्याने सदैव ध्यानात ठेवावे. म्हणजे हे सर्व मी मिळवले आहे, मी कर्ता आहे ही भावना लुप्त होईल आणि निखळ गुणविरहीत अवस्था अनुभवता येऊन आत्मानंदाचा आस्वाद कायमचा मिळत राहील. अशा प्रकारे गुणांपासून मुक्त होऊन जीव आपला जीवभाव सोडतो आणि माझ्याशी एकरूप होतो. जीवाने जीवभाव विसरण्यासाठी विषयांची विरक्ती धरावी आणि अंतःकरणात कोणत्याही इच्छेला, अगदी मुक्तीच्या इच्छेलाही स्थान देऊ नये. संपूर्ण निरिच्छ होणे हे गुणविरहीत होण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. अशा रीतीने माझी निरपेक्ष भक्ती अधिकाधिक प्रेमाने करावी. त्यामुळे अपरंपार सत्त्वशुद्धी होते आणि सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी माझी उपस्थिती जाणवते. साधकांनी माझे भजन करून हेच मिळवायचे असते. अशा रीतीने माझे भजन केले असता विस्मरणालाच मरण येते, त्यामुळे माझे विस्मरण कधीच होत नाही. सर्वेद्रियांमध्ये सावधपणा सहजच ठासून राहतो. त्या वेळी रज आणि तम हे दोन्ही गुण निखालस नष्ट होऊन जातात आणि त्या योगाने शुद्ध सत्त्वाच्या स्फूर्तीने साधकांना पूर्ण आत्मानंद लाभतो.
क्रमशः