भारत राष्ट्र समितीचे नेते के. चंद्रशेखर राव अर्थात केसीआर यांनी राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्वासाठी पायाभरणी सुरू केली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुका डोळय़ासमोर ठेऊन महाराष्ट्रानंतर सबंध देशात प्रभाव वाढविण्याचा त्यांचा मनोदय असून, तो फलद्रुप होणार का, याचे उत्तर येत्या वर्षभरातच मिळेल. किंबहुना, सध्या तरी ते त्यादृष्टीने गांभीर्याने पावले टाकताना दिसतात. स्वतंत्र तेलंगणाच्या निर्मितीकरिता राव यांनी कणखरपणे लढा दिला. त्यांच्या लढय़ाला यश आल्याने आंध्रातून वेगळे होत तेलंगण हे राज्य निर्माण झाले. त्या अर्थी ते या नव्या राज्याचे शिल्पकार. 2014 पासून तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची कमान त्यांच्या हाती आहे. तथापि, आता पंतप्रधानपदाची खुर्ची त्यांना खुणावत असल्याचे पहायला मिळते. त्यातून तेलंगण राष्ट्र समिती या आपल्या प्रादेशिक पक्षास अखिल भारतीय रूप मिळवून देण्यासाठी त्यांनी त्याचे नामकरण केल्याचे दिसून येते. आता भारत राष्ट्र समिती या नावाने हा पक्ष पुढे आला असून, याद्वारे देशातील नागरिकांवर आपला व आपल्या पक्षाचा प्रभाव पाडण्यासाठी ते सरसावल्याचे पहायला मिळते. अर्थात पुढचा टप्पा तितकासा सोपा नसेल. तेलंगण व महाराष्ट्राच्या सीमा परस्परांना भिडलेल्या आहेत. हे लक्षात घेऊन केसीआर यांनी नांदेडमधून पहिले सीमोल्लंघन घडवून आणले. पक्षवाढीच्या या शुभारंभाच्या कार्यक्रमासाठी पक्षातील नेते, आमदार, खासदार, पदाधिकारी यांनी चांगलीच ताकद लावली होती. तरीही म्हणावे तसे शक्तिप्रदर्शन करण्यात केसीआर यांना यश आल्याचे दिसले नाही. या मर्यादांची जाणीव ठेऊनच त्यांना पुढचे आडाखे आखावे लागतील. ‘अब की बार, किसान सरकार’ हा त्यांनी दिलेला नारा, शेतकऱयांच्या आत्महत्येकडे वेधलेले लक्ष यातून शेती व शेतकऱयांच्या प्रश्नावर प्रामुख्याने त्यांचा भर राहणार, हे अधोरेखित होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरीवर शपथ घेत पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते सांगतात. यातूनही महाराष्ट्रातील जनतेला आपलेसे करण्याचा त्यांचा प्रयत्न प्रतिबिंबित होतो. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस अशा प्रमुख पक्षांनी महाराष्ट्राचा अवकाश व्यापला आहे. याशिवाय मनसे, एमआयएम, आप, सप, वंचित बहुजन आघाडी, शेकाप या व अन्य पक्षांचे राज्यात पॉकेट्स आहे. अर्थात यातील अनेक पक्षांचे अस्तित्व हे नगण्य स्वरुपाचेच म्हणावे लागेल. आता या उपरान्त महाराष्ट्रात बीआरएस नवी भाजणी कशी करणार, याबाबत औत्सुक्य आहे. एमआयएमसारख्या पक्षाचा हैदराबादमध्ये प्रभाव आहे. हैदराबादपासून जवळच असलेल्या नांदेडमधून एमआयने राज्याच्या राजकारणात चंचुप्रवेश केल्याचा इतिहास फार जुना नाही. तसाच प्रयत्न केसीआर करत असेल, त्याकरिता त्यांना हक्काचा मतदार शोधावा लागेल. एमआयएमने मुस्लिम समाजाच्या पाठबळावरच काही ठिकाणी नगरसेवक, आमदार व खासदारपदापर्यंत मजल मारली. आपली व्याप्ती वाढविण्याकरिता सीमावर्ती भागातील आंध्र वा तेलंगणी नागरिकांबरोबरच इतरांशी बीआरएसला जोडू घ्यावे लागणार आहे. शेजारील आंध्रमध्ये तसे पाय रोवणे त्यांच्याकरिता कठीण होय. कर्नाटकात देवेगौडांच्या पक्षाच्या मदतीने पक्षविस्तार करण्याच्या ते प्रयत्नात आहेत. इतर राज्यांमध्ये बस्तान बसविण्याचे त्यांचे लक्ष्य असले, तरी हे सगळे कसे साधणार, हाच मूळ प्रश्न आहे. आपचे अरविंद केजरीवाल, तृणमूलच्या ममता बॅनर्जी यांच्यासारखे नेतेही पंतप्रधानपदाची मनीषा बाळगून आहेत. बीआरएसच्या नामकरण सोहळय़ास देशातील वेगवेगळय़ा नेत्यांना आमंत्रित करून राव यांनीही राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व प्रस्थापित करण्याचा आपला उद्देश सप्रमाण दाखवून दिला. अर्थात केजरीवाल, केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन, पंजाबचे मुख्यमंत्री भागवतसिंह मान, सपाचे अखिलेश यादव असे काही नेते वगळता अन्य नेते अनुपस्थित होते किंवा त्यांना निमंत्रण तरी दिले गेले नव्हते. मागच्या काही वर्षांत प्रादेशिक स्तरावरील नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा वाढलेल्या आहेत. काँग्रेस कमकुवत झाल्याने या नेत्यांना पंतप्रधानपदाची स्वप्ने पडू लागली आहेत. परंतु, या प्रादेशिक नेतृत्वातील अंतर्विरोध पाहता त्यांच्यात कितपत एकजूट होईल, याबाबत साशंकताच वाटते. त्यामुळे तिसऱया आघाडीचा प्रयोगही संदिग्धच ठरतो. वास्तवाचा विचार केला, तर आजही भाजपाचा मुख्य प्रतिस्पर्धी हा काँग्रेसच आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात, पंजाब, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, तेलंगण, उत्तराखंड, ईशान्य भारतातील काँग्रेसचे अस्तित्व नाकारता येणार नाही. तुलनेत सगळय़ाच प्रादेशिक पक्षांना, नेत्यांना मर्यादा आहेत. केसीआर यांनी प्रत्यंचा खेचली असली, तरी या साऱयाची त्यांनाही जाणीव असावी. खरे तर तेलंगणमध्ये भाजपाने पक्ष संघटना मजबूत करतानाच पक्षाचे बिनीचे नेते फोडून राव यांची कोंडी केली आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत केसीआर यांच्या पक्षापुढे भाजपाचे कडवे आव्हान असेल. केसीआर यांचे पुत्र के. टी. रामाराव कॅबिनेट मंत्री, तर त्यांच्या कन्या विधान परिषदेच्या आमदार आहेत. त्यामुळे भाजपाकडून घराणेशाहीचा आरोप जोरकसपणे होणार, हे वेगळे सांगायला नको. तेलंगणमध्ये लोकसभेच्या 17 जागा आहेत. मागील खेपेला तेलंगण राष्ट्र समितीला 9 जागा मिळाल्या होत्या. पुढची लढाई आणखी कठीण असेल. विविध कल्याणकरी योजना, त्यातून मिळालेली लोकप्रियता या राव यांच्या जमेच्या बाजू असल्या, तरी अनेक आश्वासनांची अद्याप पूर्ती झाली नसल्याचाही आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर भारतव्यापी मोहिमेचे शिवधनुष्य केसीआर यांना पेलावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता अद्याप कायम आहे. ‘भारत जोडो’च्या माध्यमातून राहुल गांधी यांनी स्वतःला देशवासीयांशी जोडून घेतले आहे. त्यामुळे केसीआर यांच्यापुढे दुहेरी आव्हान असेल.
Previous Articleकाँग्रेसच्या रजनी पाटील राज्यसभेतून निलंबित
Next Article 8 वर्षांमध्ये 40 टक्के वाढली अणुऊर्जा क्षमता
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.