ऑनलाईन टीम / तरुण भारत :
चंद्रपूर शहरालगत मूल मार्गावरच्या अजयपूर गावाजवळ पेट्रोल टँकर आणि लाकूड वाहतूक करणाऱ्या ट्रकचा गुरूवारी रात्री भीषण अपघात झाला. अपघातानंतर दोन्ही वाहनांना आग लागली. आगीमुळे ट्रकचे टायर फुटल्याने आगीने क्षणार्धात उग्र रुप धारण केले. या आगीत लाकूड भरलेल्या ट्रकमधील सात जणांचा तर टँकरमधील दोघांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजयपूर गावाजवळ रात्री पेट्रोल टँकर आणि लाकडाने भरलेल्या ट्रकची धडक झाली. अपघातानंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला. पेट्रोल टँकर आणि दुसऱ्या ट्रकमध्ये लाकडं असल्याने आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केलं. आगीची माहिती मिळताच मूल-चंद्रपूर अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत सकाळपर्यंत ही आग विझवली. या आगीत ट्रकमधील 7 तर टँकरमधील दोघांचा असा नऊ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. प्लास्टिक पोत्यांमधून हे शव चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे.
टँकरमधील चालक अमरावती निवासी हाफीज खान आणि वाहक वर्धा निवासी संजय पाटील यांचा मृतात समावेश आहे. ट्रकमधील 7 जण बल्लारपुर तालुक्यातील नवी दहेली आणि कोठारी गावचे रहिवासी असल्याची माहिती आहे. त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांचा या प्रकरणी तपास सुरू आहे.