दर आवाक्यात : सर्वसामान्यांना दिलासा
प्रतिनिधी /बेळगाव
मागील पंधरा दिवसांपासून भाजीपाल्याचे दर हळूहळू कमी होऊ लागले आहेत. विशेषत: पालेभाज्यांचे दर कमी होऊ लागले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. मागील सहा महिन्यांत भाजीपाल्याचे दर भरमसाट वाढले होते. वाढत्या दराने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले होते. मात्र, आता आवक वाढत असल्याने भाजीपाल्याचा दरात घट होत आहे.
शनिवारच्या आठवडी बाजारात ओली मिरची 60 रु. किलो, गवार 60 रु. किलो, ढबू 40 रु. किलो, गाजर 40 रु. किलो, बिनिस 30 रु. किलो, वांगी 50 रु. किलो, टोमॅटो 10 रु. किलो, बटाटा 30 रु. किलो, कारली 40 रु. किलो, हिरवा वाटाणा 80 रु. किलो, भेंडी 50 रु. किलो, कोबी 10 रुपये एक,
फ्लॉवर 10 रुपये एक, मेथी 10 रुपयांना तीन पेंड्या, लालभाजी 10 रुपयांना दोन पेंड्या, नवलकोल 20 रुपयांना सहा, पालक 10 रुपयांना दोन पेंड्या, कांदापात 20 रुपयांना पाच पेंड्या, मुळा 10 रुपयांना तीन, आले 100 रु. किलो असा दर आहे.
मागील काही महिन्यांपासून भाज्यांचे वाढलेले दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना सर्व भाज्या खरेदी करणे शक्य झाले आहे. विशेषत: 20 रुपयांना पेंडी मिळणारी कोथिंबीर 10 रुपयांना तीनप्रमाणे विकली जात आहे. गाजर, ढबू, बिनिस, टोमॅटो, लालभाजी, कांदापात, पालक, फ्लॉवर आदी भाज्यांचे दर कमी झाले आहेत. त्यामुळे गृहिणींतून समाधान व्यक्त होत आहे.
खाद्यतेल
वाढलेल्या खाद्यतेलांचे दर अद्याप कमी झाले नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांना चढ्या दरानेच खाद्यतेल खरेदी करावे लागत आहे. रशिया-युक्रेन युद्धापासून वाढलेले खाद्यतेलांचे दर अद्याप स्थिर आहेत. त्यामुळे खाद्यतेलांचे दर कमी होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.