वार्ताहर/ कराड
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘तरुण भारत’ने 75 व्या स्वातंत्र्यदिन आणि सातारा जिल्हय़ातील स्वातंत्र्यसेनानींची लेखमाला प्रसिद्ध केली आहे. येथील विठामाता विद्यालयाच्या वतीने ‘तरुण भारत’ने प्रसिद्ध केलेल्या लेखमालेतील सर्व स्वातंत्र्यसेनानींच्या माहितीची कात्रणे काढून भित्तिपत्रकाद्वारे त्याचे प्रदर्शन केले आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढय़ात स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेले बलिदान व त्यागाची विद्यार्थिनींना माहिती व्हावी, यासाठी हा उपक्रम राबविल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका व्ही. एस. पवार यांनी सांगितले.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सध्या देशभरात मोठय़ा जल्लोषात व उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात येत आहे. अमृत महोत्सवाच्या निमित्ताने शनिवारपासून ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. तिरंगा आपली शान व अभिमान आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी मोठय़ा सन्मानाने आपल्या घरावर तिरंगा लावावा यासाठी विविध शैक्षणिक संस्था, सामाजिक व राजकीय पक्ष, संघटना व प्रशासनाच्या वतीने आठवडाभरापासून कराड शहर व तालुक्यात तिरंगा रॅली काढण्यात येत आहे. ग्रामपंचायती, नगरपालिका व पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून नागरिकांना ध्वज उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामुळे सर्वत्र देशभक्तीचे वातावरण पहावयास मिळत आहे.
‘तरुण भारत’ने जवळपास अडीच महिन्यांपूर्वीच अमृत महोत्सवाच्या उपक्रमास सुरुवात केली आहे. लाखो स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान व त्यागाने भारताला स्वातंत्र्य मिळाले. या स्वातंत्र्य दिनाला यावर्षी 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त ‘तरुण भारत’च्या वतीने सातारा जिल्हय़ातील स्वातंत्र्यसेनानींच्या कार्याची लेखमाला सुरू केली आहे. शनिवारी 75वा भाग प्रसिद्ध झाला. ‘तरुण भारत’ने राबवलेल्या या उपक्रमाला संपूर्ण जिल्हय़ातून मोठा प्रतिसादही मिळाला आहे.
कराडच्या विठामाता विद्यालयाने या लेखमालेतील सर्व स्वातंत्र्यसेनानींच्या माहितीची कात्रणे काढून त्याचे भित्तिपत्रकाद्वारे प्रदर्शन भरवत स्वातंत्र्यसेनानींना अनोखे अभिवादन केले आहे. शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्टचे अध्यक्ष जयंतकाका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विठामाता विद्यालयाच्या वतीने नेहमीच अभिनव उपक्रम राबवण्यात येतात. यावर्षी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव असल्याने शाळेने देशभक्तीपर वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला, नृत्य, समूह गीत गायन आदी स्पर्धांचे आयोजन केले आहे. ‘तरुण भारत’ने प्रसिद्ध केलेल्या स्वातंत्र्य सेनानींच्या माहितीची लेखमाला सर्व विद्यार्थिनींना वाचता यावी, यासाठी भित्तिपत्रक प्रदर्शित केले आहे. कलाशिक्षक रमेश मोरकळ यांनी हा उपक्रम राबवला असून या भित्तिपत्रकाचे उद्घाटन सोमवारी होणार आहे. विद्यार्थिनींनी स्वातंत्र्यसैनिकांची माहिती वाचून टिपण तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे मुख्याध्यापिका व्ही. एस. पवार यांनी सांगितले.
व्हिडीओद्वारे स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याची माहिती
शाळेतील शिक्षिका उज्ज्वला मोरे यांनी अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्यसैनिकांच्या माहितीचे व्हिडीओ तयार केले आहेत. विद्यार्थिनींना मोबाईलवर व्हिडीओच्या माध्यमातून स्वातंत्र्यसैनिकांची माहिती कळावी यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे. आतापर्यंत 65 स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्यकर्तृत्वाचे व्हिडीओ तयार करण्यात आले आहेत. 75 स्वातंत्र्यसैनिकांचे व्हिडीओ तयार करण्याचा उज्ज्वला मोरे यांचा मानस असल्याचे मुख्याध्यापिका पवार यांनी सांगितले.