सम्मेद शिखर्जी बचाव आंदोलन, जैन युवा संघटनेतर्फे आयोजन
प्रतिनिधी/ बेळगाव
झारखंड येथे जैन धर्मियांचे पवित्र धर्मस्थळ असलेले सम्मेद शिखर्जी परिसर पर्यटनस्थळामध्ये रुपांतर केल्याचा आरोप करत बेळगाव जिल्ह्यातील जैन समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
केंद्र सरकारने कोणत्याही प्रकारची चौकशी न करता त्याला तातडीने परवानगी दिली. त्यामुळे या पवित्रस्थळाचे महत्त्व कमी होणार आहे. याठिकाणी बेकायदेशीर तसेच अनैतिक कृत्ये होण्याची शक्यता आहे. तेव्हा केंद्र सरकारने दिलेला हा आदेश मागे घ्यावा, यासाठी बेळगावमधील दिगंबर आणि श्वेतांबर जैन बांधवांनी निदर्शने केली.
जैनधर्मिय हे अल्पसंख्याक असले तरी आम्ही संघटित आहोत. जैन समाज हा अत्यंत धार्मिक आचरण करणारा आहे. राष्ट्रप्रेम, धर्माचे रक्षण, धर्माचे संरक्षण करणारा हा धर्म आहे. अहिंसेच्या मार्गावरून जाणारे हे धर्मीय असून केंद्र सरकारने आणि झारखंड सरकारने जो आदेश बजावला आहे तो तातडीने मागे घ्यावा, अन्यथा आम्हालाही पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा या मोर्चातून देण्यात आला.
झारखंड राज्यात 16,000 एकरमध्ये सम्मेद शिखर्जी आहे. 24 तीर्थंकरांपैकी 20 तीर्थंकरांना त्याठिकाणी मोक्ष प्राप्त झाला आहे. 20 कोटीहून अधिक ऋषीमुनी मोक्षासाठी गेले होते. 27 कि.मी. हा परिसर पूर्ण जैनधर्मियांचा आहे. त्या क्षेत्राला पर्यटनस्थळ बनवू नये, अशी मागणी केली. यावेळी आम्हाला कोणताही विकास नको. ज्या परिस्थितीत हे क्षेत्र आहे त्या स्थितीतच रहावे, त्याची पवित्रता जपावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. शिखरची सुरक्षितता करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, आम्हाला सरकारकडून त्यासाठी कोणतीही मदत नको. मात्र जो आदेश बजावला आहे तो मागे घ्यावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
झारखंड सरकारच्या विनंतीवरून केंद्राच्या अरण्य सचिवालयाने 2 ऑगस्ट 2019 रोजी समृद्ध असलेले सम्मेद शिखर्जी क्षेत्र पर्यटनस्थळ बनविण्यासाठी अध्यादेश जारी केला. मात्र, त्यामुळे या क्षेत्राची पवित्रता नष्ट होणार आहे. तेव्हा त्याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. आम्ही अल्पसंख्याक असलो तरी आंदोलन करण्यास सज्ज आहोत. तेव्हा याचा गांभीर्याने विचार करावा आणि केंद्र सरकारने दिलेला आदेश मागे घ्यावा, असेही या निवेदनात म्हटले आहे.
धर्मवीर संभाजी चौक येथून जैन युवा संघटनेच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये दिगंबर, श्वेतांबर जैन बांधवांनी भाग घेतला होता. जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर अनेकांनी आपले रोखठोक विचार व्यक्त केले. जैन धर्माविषयी माहिती देऊन झारखंडमधील सम्मेद शिखर्जीबद्दलची पवित्रता सांगितली. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी आमदार संजय पाटील, नगरसेविका प्रिया सातगौडा, विनोद दो•ण्णावर, सुनील हनमन्नावर, राजेंद्र जैन, कुंतीनाथ कलमनी, अभय अवलक्की, कंतूसागर हरदी, विक्रम जैन यांच्यासह बैलहोंगल, खानापूर, हुक्केरी तालुक्यातील जैन समाजाचे नेते, महिला मंडळ, सर्व बासदीचे विश्वस्त, युवक मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.