सर्वोच्च न्यायालयाकडून 3 न्यायाधीशांचे खंडपीठ स्थापन
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
महाराष्ट्रातील बदललेल्या राजकीय स्थितीदरम्यान विविध याचिकांवर सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने तीन न्यायाधीशांचे खंडपीठ स्थापन केले आहे. हे खंडपीठ बुधवार, 20 जुलै रोजी याप्रकरणी सुनावणी करू शकते. सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा, न्यायाधीश कृष्ण मुरारी आणि हिमा कोहली यांचे खंडपीठ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून दाखल याचिकांवर सुनावणी करणार आहे.
यापूर्वी 11 जुलै रोजी शिंदे गटाला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला होता. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्र घोषित करण्याची मागणी करणाऱया याचिकेवरील सुनावणी तात्पुरत्या स्वरुपात टाळली होती. तसेच याप्रकरणी खंडपीठ स्थापन केले जाणार असून या प्रक्रियेला वेग लागणार असल्याचे म्हटले होते. याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे यांच्या गटालाही दिलासा देत महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना याप्रकरणी सुनावणी पूर्ण होईपर्यंत कुठलाही निर्णय न घेण्याचा आदेश दिला होता.
शिवसेनेतील शिंदे गटाने वेगळा मार्ग पत्करल्यावर विधानसभा उपाध्यक्षांनी 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली होती. या नोटिसीविरोधात शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी सुनावणी करत न्यायालयाने दोन्ही गटांच्या आमदारांवर कुठलीही कारवाई करण्यास स्थगिती दिली आहे.
एकनाथ शिंदे यांनी 30 जून रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. शिंदे मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नसल्याने उद्धव ठाकरे यांचा गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून टीका केली जात आहे.