भात, भुईमूग, रताळी, भाजीपाला पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान : नगरपंचायतीला निवेदन देऊनही दुर्लक्ष : नागरिकांतून तीव्र संताप : डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी
वार्ताहर /किणये
मच्छे गावात डुकरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. आता डुकरांच्या कळपाने चक्क भात पिकात घुसून पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान करण्यास सुरुवात केली आहे. पोसवून आलेल्या भात पिकाची मोठय़ा प्रमाणात नासाडी करत असल्याने बळीराजा वैतागला आहे. मच्छे नगरपंचायतीला अनेक वेळा याबाबत निवेदन देऊनही या डुकरांचा बंदोबस्त करण्याकडे नगरपंचायतीचे साफ दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी शेतकरी वर्गातून होत आहेत.
गेल्या पाच ते सहा वर्षांपासून गावात डुकरांच्या कळपाचा वावर वाढला आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. डुकरे गावात बिनधास्तपणे फिरत आहेत. यामुळे महिला व बालकांना गल्लीतून ये-जा करणे अवघड बनले आहे. नगरपंचायतीला वारंवार सांगूनही यावर योग्य तो तोडगा काढला जात नाही, मग आता आम्ही दाद मागायची तरी कोणाकडे? असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे.
शेतकऱयांमध्ये चिंतेचे वातावरण
मच्छे परिसरातील भात, भुईमूग, रताळी व भाजीपाला पिकांमध्ये डुकरांचा कळप जाऊन पिके फस्त करू लागली आहेत. यामुळे हातातोंडाला आलेल्या पिकांचे होत असलेले नुकसान पाहून शेतकऱयांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. या डुकरांचा बंदोबस्त करायचा तरी कसा, याची चिंता त्यांना भेडसावू लागली आहे.
डुकरांचा बंदोबस्त करण्याचे केवळ आश्वासनच
नगरपंचायतीला तीनवेळा निवेदने देण्यात आली. यावेळी नोडल अधिकाऱयांनी डुकरांचा बंदोबस्त करण्यासंदर्भात आश्वासनही दिले. मात्र त्याची पूर्णपणे अंमलबजावणी करण्यात आली नाही, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. मच्छे शिवारातील भातपिके पोसवू लागली आहेत. याच भात पिकात डुकरांचा कळप शिरून पिकांचे नुकसान करीत आहेत.
महिलांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार
गल्लीतील अनेक नागरिकांच्या घरच्या दरवाजाजवळ जाऊन ही डुकरे जोरजोराने ओरडू लागली आहेत. त्यामुळे लहान बालके भयभीत होत आहेत. तसेच काहीवेळा तर महिलांच्या अंगावर ही डुकरे धावून जात आहेत. त्यामुळे महिला व बालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
निवेदनाची दखल घेत नाहीत याचीच खंत
गावातील डुकरांचा बंदोबस्त करण्यासंदर्भात आम्ही बेळगावकर गल्ली, हवळनगर ग्रामस्थांतर्फेही नगरपंचायतीला निवेदन दिले होते. मात्र याची दखल कोणीही घेतली नाही याची खंत आम्हाला आहे. डुकरांचा बंदोबस्त करण्याची प्रशासनाकडे कोणतीही उपाययोजना नाही का? सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी नगरपंचायत पुढाकार का घेत नाही.
– सचिन बेळगावकर-ग्रा.पं. माजी सदस्य
डुक्कर मालकांना जाब विचारण्याची गरज
मच्छे गावात डुकरांची समस्या पाच सहा वर्षांपासून आहे. अलीकडे 50 ते 60 डुकरांचा कळप गावात बिनधास्तपणे फिरताना दिसत आहे. या डुकरांनी भाजीपाला, भात व इतर पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान केले आहे. आम्ही मच्छे नगरपंचायतीला तीनवेळा निवेदन दिले आहे. तसेच नोडल अधिकाऱयांना याबाबत भेटून वरचेवर माहिती दिली आहे. सदर डुकरांचा बंदोबस्त करण्यात यावा. याबाबत वडगाव ग्रामीण पोलिसांना ही माहिती दिलेली आहे. आम्ही शेतकऱयांनी याबाबत संबंधित अधिकाऱयांना, पोलीस प्रशासनाला सांगूनही सदर डुकरांचा बंदोबस्त का केला जात नाही. सदर डुक्कर मालकांना पोलिसांनी जाब विचारण्याची गरज आहे.
– सुरेश लाड, देवस्थान पंच कमिटी उपाध्यक्ष