श्रीनगर / वृत्तसंस्था
पाकिस्तानचे समर्थन करणारा काश्मीरमधील एक मोठा फुटीरवादी आता आपली दहशतवादी विचारसरणी सोडून देऊन राजनैतिक प्रक्रियेत सहभागी होण्याच्या तयारीत आहे. हा फुटीरवादी राजकीय पक्ष स्थापन करणार असून आगामी विधानसभा निवडणुकीत सहभागी होणार आहे. त्याचे नाव सुरक्षेच्या कारणास्तव गुप्त ठेवण्यात आले आहे. मात्र त्याचे कुटुंब हुरियत काँन्फरन्सशी संबंधित आहे, एवढी माहिती उपलब्ध झाली आहे. काश्मीरमधील आणखी काही फुटीरतावादी नेतेही राजकीय मुख्य प्रवाहात येण्याचा विचार करीत आहेत.
काही वृत्तसंस्थांच्या सूत्रांनी ही माहिती दिली. जेव्हापासून काश्मीरला विशेष दर्जा देणारा घटनेतील अनुच्छेद 370 आणि अनुच्छेद 35 अ निष्प्रभ करण्यात आले आहेत, तेव्हापासून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आणि फुटीरतावादाची धार बोथट झाल्याचे दिसून येते. भारताशी भांडत राहण्यात आणि पाकिस्तानचे समर्थन करत राहण्यात काहीही लाभ नाही. केवळ तो वेळेचा अपव्यय आणि शक्तीचा नाश आहे याची जाणीव त्यांना होऊ लागली आहे. काश्मीर भारतापासून अलग करणे शक्य होणार नाही, हे सत्यही त्यांना उमगू लागल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
त्यामुळे भारताच्या राजकीय प्रक्रियेत सहभागी होऊन काश्मीरमध्ये आपले अस्तित्व टिकविण्याचा पर्याय अनेक फुटीरतावादी स्वीकारत असल्याचे दिसते. यातून काश्मीरमध्ये शांतता निर्माण होण्यास सहाय्य होणार आहे. अनुच्छेद 370 निष्प्रभ केल्यानंतरही काश्मीर खोऱयातील जनता शांत आहे. हिंसाचार करण्याची या जनतेची तयारी नाही. याचाच अर्थ, जनतेला अस्थिरता नको आहे, असा घेतला जात आहे. फुटीरतावादीही आता शांततेच्या मार्गाने जाण्यात आपले हित असल्याचे मानू लागले आहेत, हे ताज्या घडामोडींवरुन स्पष्ट होत आहे.