नुकतेच दिल्लीत प्रधानमंत्री किसान सन्मान संमेलन पार पडले आहे. या प्रदर्शनात कृषीसंबंधीचे संशोधन तसेच उद्योग व्यवसायांचे प्रदर्शनही भरले होते. कृषी क्षेत्रातील महिला सबलीकरणासंबंधातही या संमेलनात अनेक स्टॉल्स लावण्यात आले होते. यामध्ये झारखंडमध्ये देविका मुखर्जी या महिलेच्या कामगिरीने अनेक तज्ञांचे तसेच उद्योजकांचे लक्ष वेधून घेतले होते. या महिलेने एक स्टार्टअप कंपनी सुरू केली असून दिवावी नामक एक ऍप विकसित केले आहे.
हे ऍप शेतकऱयांचा संबंध देशातील विविध बाजारपेठांशी जोडून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. शेतकऱयांच्या उत्पादनांना सर्वात चांगली किंमत कोणत्या बाजारपेठेत मिळेल, याची माहिती या ऍपवर काही सेकंदांमध्ये उपलब्ध होते. त्यामुळे शेतकऱयाला एकाच बाजारपेठेवर अवलंबून रहावे लागत नाही. तसेच त्या बाजारपेठेतील प्रस्थापितांची हुकूमशाहीही सहन करावी लागत नाही. अनेक शेतकऱयांनी तसेच व्यापाऱयांनीही हे ऍप डाऊनलोड करून घेतले आहे. ‘गाँव का बाजार’ असे या ऍपचे घोषवाक्मय आहे. विशेषतः जे शेतकरी बाजारपेठांपासून बऱयाच दूरवर असतात, त्यांना कोणत्याही मध्यस्थाशिवाय बाजारपेठेशी संपर्क करून देण्यासाठी हे ऍप उपयोगी पडते. अनेक शेतकरी या ऍपवर अलीकडच्या काळात पूर्णतः अवलंबून राहू लागले आहेत. ऍपमुळे बाजारपेठेमधील दरांची नेमकी माहिती शेतकऱयांना घरबसल्या कळते आणि दलालांकडून होणारी त्यांची फसवणूक टाळली जाते. हे ऍप शेतकऱयाचा संबंध थेट ग्राहकांशी जोडण्यासाठीसुद्धा उपयोगात आणले जाऊ शकते. शेतकऱयाला केवळ कृषीमालाचा उत्पादक नव्हे तर उद्योजक बनविण्याचा देविका मुखर्जी यांचा ध्यास आहे. कृषीमालाची स्वस्तात खरेदी करून तो वाजवीपेक्षा जास्त दराने ग्राहकांना विकून दोन्हीकडून फायदा मिळविणाऱया दलालांना या ऍपमुळे फाटा मिळालेला आहे. आपल्या उत्पादनाला कोणत्या बाजारपेठेत अधिक किंमत मिळेल, याची माहिती शेतकऱयाला वेळेवर मिळाल्यास तो त्या बाजारपेठेपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था करू शकतो. बाजारपेठेतील ग्राहकांनाही कुणाकडे कोणते उत्पादन उपलब्ध आहे आणि त्याचा किती साठा आहे, याची माहिती मिळाल्याने किंमत ठरविण्यामध्ये सुविधा निर्माण होते. शेतकऱयांना त्यांच्या श्रमाचा पुरेसा मोबदला देण्याबरोबरच शेवटच्या ग्राहकाचे शोषण दलालांकडून होऊ नये, याची दक्षता या ऍपमुळे घेतली जाते.
देविका मुखर्जी यांच्या स्टार्टअप आणि ऍपचे नेटवर्क अनेक राज्यांमध्ये पसरलेले असून या ऍपवरून मिळालेल्या माहितीच्या आधारावर 500 किलोमीटर दूर असलेल्या बाजारपेठांमध्येही शेतकरी माल विकू शकत आहेत. त्यामुळे या ऍपचा उपयोग करणाऱया शेतकऱयाच्या उत्पन्नामध्ये मोठी भर पडते, असा अनुभव आहे.