विदेश मंत्रालयाचे वक्तव्य : वाद शांततेच्या मार्गाने सोडविण्यात यावा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गुयाना-व्हेनेझुएला या दक्षिण अमेरिकेतील देशांदरम्यान सध्या एका भूभागावरून वाद सुरू असून तो युद्धात रुपांतरित होण्याची चिन्हे आहेत. यामुळे भारतीय विदेश मंत्रालयाने या वादासंबंधी एक वक्तव्य जारी केले आहे. आम्ही याप्रकरणी बारकाईने नजर ठेवून आहोत. गुयाना-व्हेनेझुएला सीमा वाद आंतरराष्ट्रीय न्यायालयात विचाराधीन असल्याचे आम्ही जाणून आहोत. हा वाद शांततेच्या मार्गाने सोडविण्यात यावा असे आमचे मानणे आहे. दोन्ही देशांदरम्यान या मुद्द्यावर झालेल्या राजनयिक स्तरीय चर्चेचे स्वागत करत असल्याचे विदेश मंत्रालयाने म्हटले आहे.
व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो हे शेजारी देश गुयानाकडून नियंत्रित एस्सेक्विबो या भूभागावर कब्जा करण्यासाठी सैन्यमोहीम हाती घेऊ पाहत आहेत. एस्सेक्विबो या भूभागात कच्च्या तेलाचे मोठे साठे असल्याचा शोध अलिकडेच लागला आहे. मादुरो यांनी व्हेनेझुएलाच्या तेल कंपन्यांना एस्सेक्विबो भागात कच्च्या तेलाचे उत्खनन करण्यासाठी परवाने जारी केल्याने दोन्ही देशांमधील वाद चिघळला आहे.
तणाव पाहता गुयानाने स्वत:च्या संरक्षण दलाला सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. एस्सेक्विबो या भूभागावर एक शतकापेक्षा अधिक काळापासून गुयाना आणि त्यापूर्वी ब्रिटिश गुयानाचे अधिकारक्षेत्र राहिले आहेत. परंतु व्हेनेझुएला आता त्यावर कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहे. एस्सेक्विबा हा आमचा हिस्सा असल्याचा व्हेनेझुएलाचा दावा आहे. एस्सेक्विबोमध्ये कच्च्या तेलाचे मोठे साठे असल्याने दोन देशांमधील वाद वाढल्याचे मानले जात आहे.